शुक्रवार, 30 दिसंबर 2011

बचतीतून उभारली गेली मालमत्‍ता !

स्‍वर्ण जयंती ग्राम स्‍वरोजगार योजना, पंचायत समिती, हिंगणघाट जि.वर्धा अंतर्गत उत्‍कृष्‍ट काम करणा-या बचत गटामधील बसवेश्‍वर महाराज महिला बचत गट, डायगव्‍हाण येथील बचत गटाच्‍या कामाची तपासणी प्रतिभा पाटील यांनी केली. त्‍यात त्‍यांना या गटाची स्थिती चांगली असल्‍याचे पुन्‍हा सिध्‍द झाले. 
 
बसवेश्‍वर महाराज महिला बचत गटाची स्‍थापना फेब्रुवारी २००७ ला करण्‍यात आली. या गटात एकूण १४ सदस्‍य आहेत. त्‍यात अ.जा.चे १ व अ.ज. चे १३ सदस्‍य अंतर्भूत आहेत. या बचत गटामध्‍ये मासता रमेशराव काळे यांना अध्‍यक्ष व तुळशा किसनराव गटरी यांना सचिव म्‍हणून पद देण्‍यात आले. या गटाची बचत नियमीत स्‍वरुपाची असूऩ, या गटाचे व्‍यवहार बाबत खाते बँक ऑफ बडोदा, हिंगणघाट येथे होत असतात. 
या गटाने दुग्‍ध व्‍यवसायाची निवड केलेली असून, त्‍यासाठी त्‍यांनी बँकेकडून १ लाख २० हजार रुपये कर्ज घेतले व त्‍यांना १ लाख २० हजार अनुदान मिळाले. अशी त्‍यांची एकूण प्रकल्‍प किंमत २ लाख ४० हजार रुपये झाली. त्‍यांनी हे कर्ज १७ सप्‍टेंबर २००९ ला उचलले व त्‍यांचे हे कर्ज २१ जोनेवारी २०१० या वर्षी मंजूर करण्‍यात आले. त्‍यांना बँकेकडून वितरीत झालेले कर्ज म्‍हणून पहिला हप्‍ता ८२,००० रुपये व दुसरा हप्‍ता १८,००० रुपये देण्‍यात आले. त्‍यांची‍ वितरीत मालमत्‍ता १ लाख ४० हजार झालेली आहे. 

बसवेश्‍वर महाराज महिला बचत गटाने दुग्‍धव्‍यवसाय सुरु केल्‍यामुळे त्‍यांना गटात एकूण ३०,००० रुपये उत्‍पन्‍न मालमत्‍तेच्‍या स्‍वरुपात झाले व आर्थिक स्‍वरुपात २८,००० रुपये उत्‍पन्‍न झाले. बँकेकडून मिळालेले कर्ज १ लक्ष रुपये याची परतफेड त्‍यांनी केली असून, गटाकडे सध्‍या ७ म्‍हशी आहेत. 

गटाची मासिक सभा घेणे सुरु आहे. त्‍यांचे बँकेचे आर्थिक व्‍यवहार नियमित होत असून, बँकेकडून उचल केलेल्‍या कर्जाचा उपयोग गटाने उत्‍तम प्रकारे केला जातो. सर्व गटातील सभासदांचे सहकार्य चांगले आहे. 

गटाने केवळ व्‍यवसाय न देता व्‍यावसायिक मालमत्‍ता दिल्‍याने आता गटात आर्थिक सुबत्‍ता नांदत आहे. 


महान्‍यूज वरुन साभार 

बचतगटाने दिली सावकारापासून मुक्‍ती


          वर्धा जिल्‍ह्यातील देवळी पासून १८ कि.मी. अंतरावर असलेले बोपापूर वाणी वरुन आतमध्‍ये खर्डा हे गाव आहे. या गावाची एकूण लोकसंख्‍या ११२७ असूऩ, घर संख्‍या २६० आहे. गावामध्‍ये बचत गटाच्‍या बचतीचा कोणताही गंध नसताना त्‍या गावातील १७ बीपीएल महिलांनी एकत्र येवून बचतगट सुरु केला. बचत गटामध्‍ये १७ पैकी एकूण १० बीपीएल होत्‍या. सावकाराच्‍या पाशातून मुक्‍तता व्‍हावी व महिलांच्‍या गरजा भागवून काही बचत शिल्‍लक राहावी या उद्देशाने बचत गटाची स्‍थापना करण्‍यात आली. 

 
या महिलांना कोणाचेही मार्गदर्शन नसताना अंतर्गत व्‍यवहार सुरु केला व एका वर्षामध्‍ये मासिक बचत जमा करुन त्‍यामध्‍ये अंतर्गत कर्जाचा व्‍यवहार करुन पूर्ण परतफेड करण्‍यात महिला यशस्‍वी झाल्‍या. त्‍यानंतर ग्रामपंचायतमध्‍ये स्‍वस्‍त धान्‍याचे दुकान व रॉकेलच्‍या व्‍यवसायासाठी त्‍यांनी त्‍यांच्‍या गटाचा फॉर्म भरला व १ एप्रिल २००८ पासून त्‍यांच्‍या कार्याला गती मिळाली. २००८ मध्‍ये ग्रेडेशन झाले व त्‍याच वर्षी त्‍यांना ५०,००० रु. खेळते भांडवल मिळाले. त्‍यापैकी त्‍यांनी १०,००० रुपये अनुदान मिळाले व उरलेले ४०,००० रुपये परतफेड केले. त्‍यानंतर त्‍यांना २००९ मध्‍ये स्‍वस्‍त धान्‍याचे दुकान व केरोसीन याचा परवाना मिळाला. 

आदिवासी रोजगार हमी महिला बचतगट यांनी मिळालेल्‍या पैशांमधून त्‍यांनी रॉकेलचे ड्रम, वजन काटा, माप हे साहित्‍य खरेदी करुन सीताबाई रामाजी कौराती यांच्‍या घरी रुम भाड्याने घेऊन व्‍यवसाय सुरु केला. त्‍यांना ८०० रुपये भाडयापोटी गटाच्‍या महिला देतात. त्‍यानंतर २०१० मध्‍ये त्‍यांना २ लाख रुपये मंजुर झाले. त्‍यामधून पहिला टप्‍पा एक लक्ष रुपये मिळाला त्‍यामधून त्‍यांनी ४०,००० रुपये परतफेड केली.त्‍यामधून त्‍यांना दुसरा टप्‍पा मिळायचा आहे. 

स्‍वस्‍त धान्‍याचे दुकान यामध्‍ये त्‍यांच्‍याकडे अंत्‍योदय बीपीएल, ओपीएल, शाळा, अंगणवाडी इत्‍यादी प्रकारामधून त्‍यांना धान्‍य वाटप करायचे आहे. तसेच त्‍यांचा स्‍वस्‍त धान्‍य दुकानाचा स्‍टॉक रजिस्‍टर व विक्री रजिस्‍टर इत्‍यादी रेकार्ड आहे. 
आदिवासी रोजगार हमी महिला बचत गट या गटामध्‍ये कामाची पध्‍दत म्‍हणजे रोज २ महिला, ५० रुपये रोजाप्रमाणे धान्‍य वाटप करतात. त्‍यांची वेळ ठरलेली आहे. सकाळी ९ ते ५ पर्यंत या महिला काम करतात.गटामध्‍ये सर्व महिला एकजुटीने काम करतात.त्‍यामुळे हा गट व्‍यवस्थित चालू आहे.   

 महान्‍यूज वरुन साभार




बचतगटाने दिले ग्रामपंचायत सदस्‍यपद

बचत गटाच्‍या चळवळीने केवळ उदरनिर्वाहाचे साधन मिळाले असे नव्‍हे तर ग्रामपंचायत सदस्‍याचे पदही मिळाले अशी ही यशोगाथा आहे वर्धा जिल्‍ह्यातील मातोश्री स्‍वयंसहायता महिला बचतगटाची.हा बचतगट येळाकेळी गावात आहे. 
२००५ साली गावातील १३ महिलांनी एकत्र येवून हा स्‍वयंसहायता गट स्‍थापन केला. साधारण १ वर्षाने ऑगस्‍ट २००६ मध्‍ये गटाला कर्ज आणि अनुदान असे प्रत्‍येकी ७ हजार, एकूण चौदा हजार रुपये प्राप्‍त झाले. 

या रकमेतून काही निधी शेळीपालनातून मिळालेले उत्‍पन्‍न व वैयक्तिक कर्जाचे व्‍याज या माध्‍यमातून पूर्ण कर्ज परत केले. नोव्‍हेंबर २००८ मध्‍ये गटाला १ लाख ८० हजार कर्ज मंजूर करण्‍यात आले. त्‍यात त्‍यांनी भांडवल वृध्‍दीसाठी याचा वापर केला. गावात या कामाची सकारात्‍मक चर्चा झाल्‍यावर अंगणवाडीचे अन्‍न शिजविण्याचे काम २ वर्षापूर्वी गटाला मिळाले. या दोन्‍हीच्‍या उत्‍पन्‍नावर अलाहाबाद बँकेचे सर्व कर्ज परत करण्‍यात आले असे गटाच्‍या अध्‍यक्षा निर्मला गव्‍हाळे यांनी सांगितले. आज गटाकडे शेळ्याही आहेत आणि अंगणवाडीचेही काम सुरु आहे.

गटाच्‍या कामाची ओळख निर्माण झाल्‍याने निर्मला गव्‍हाळे या ग्रामपंचायत सदस्‍य म्‍हणूनही निवडून आल्‍या. स्‍वयंसिध्‍दा होण्‍यासोबतच राजकारणातही संधी मिळण्‍याची आता सर्वत्र चर्चा आहे. 


महान्‍यूज वरुन साभार 

मंगलवार, 11 अक्तूबर 2011

सुबाभूळ शेती आणि कागद..!



यंत्राची जोरदार घरघर चालू आहे.. आमच्या आपसात बोलण्याचा आवाजही वाढलेला.. मशीनच्या दुस-या बाजूने पांढरा शुभ्र कागद रोल होत होता. थोडसं पुढे हाच रोल लावून दुसरं यंत्र अगदी सहजरित्या रोबोटच्या सहाय्यानं त्याच्या कटींगसह १ रिम मोजून त्याचे तयार गठ्ठे पॅकींग करित आहे आणि आलेल्या पॅकेटवर स्टीकर चिटकवण्यात येत आहे. हा शुभ्र गुळगुळीत पेपर बघितल्यावर कुणालाही चटकन लिहावं वाटेल.

हे चित्र आहे बल्लारपूर पेपर मिलचे. बैठकीसाठी चंद्रपूरला गेलो त्यावेळी मिटींगनंतर दुस-या दिवशी बल्लारपूरला जायचं ठरलं. आपण कागदावर लिहितो पण तो कागद नेमका कसा तयार होतो हे बघितलं नव्हतं त्यामळे उत्सुकता होती.

बल्लारपूर पेपर मिल हा येथील वनांवर अवलंबून सुरु केलेला कारखाना. बांबूपासून पेपर तयार करण्यासाठी सुरु झालेला हा प्रकल्प या भागात आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करीत आहे.

कारखान्यात दाखल झाल्यावर तिथल्या पध्दतीप्रमाणं डोक्यावर हेल्मेट परिधान केले आणि प्रसिध्दीची ही सेवा ज्या कागदाच्या आधारे प्रसिध्दीचे प्रामुख्याने काम करतो त्या कागदाच्या कारखान्याच्या पाहणीस निघाली. कारखान्याच्या मागील बाजूस ट्रकची भली मोठी रांग त्यात काही ट्रक बांबूने भरलेले तर काही सुबाभूळीच्या लाकडांनी हेच कागदचं पहिलं रुप.

लाकडाची धुलाई करुन तो 'चिपर' मध्ये येतो येथील अजस्त्र यंत्र ताकदशील दातांनी त्या लाकडांचा एक इंच इतका छोटा चुरा करतात तो कन्व्हेअर बेल्टने पुढे चाळणीत जातो जिथे चुकीच्या आकाराचे तुकडे पुन्हा चिपिंगकडे परततात उर्वरित डायजेशन प्रक्रियेला जात असतात करखान्याचे अभियंता चौहान माहिती देत होते हा चुरा मग रसायनं आणि पाण्याच्या उच्च तापमानात शिजतो आणि त्याचा लगदा बनतो. हा काळा असतो. त्यानंतर त्याची स्वच्छता होते व अखेरच्या यंत्रातून स्वच्छ पांढरा लगदा पुढे सरकत राहतो.

कारखान्याच्या तीनमजली इमारतीत ही प्रक्रिया तेथे क्लोरिन व इतर गॅस आणि उष्णता हे बघताना घाम आलेला या कारखान्यात १८ वर्षाखालील व ५५ वर्षावरील व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही हे विशेष कारखान्याची सध्याची क्षमता प्रतिदिन ४५० टन आहे आणि अल्पावधीत ६५० टन क्षमतेचे नवे युनिट येथे सुरु होत आहे.

पुढे हा कागद यांत्रिक पध्दतीने अखेरच्या टप्प्यात जातो. या ठिकाणी प्रक्रियेव्दारे त्यातली आर्द्रता काढून यंत्राव्दारे टनांचा दाब दिल्यावर लगदा शुभ्र आणि गुळगुळीत कागदाच्या रुपात बाहेर पडतो. इथ चर्चा करताना आमचे संचालक श्री.कौसल सर कागदाचा शोध चीन मध्ये लागला हे सांगत होते. यांत्रिक पध्दतीने हव्या त्या जाडीचा बनविण्यात येतो आणि त्यानुसार त्याचे दर ठरतात.

कागदाची मजबूती लाकडावर अवलंबून असते. आता बांबूचे क्षेत्र घटल्याने आसपासच्या राज्यातून शेतात सुबाभूळाची लागवड करुन त्याच्या फांद्या ट्रकव्दारे आणल्या जातात. सध्या मुख्य निर्मिती सुबाभळावरच होते. हे ऐकून आश्चर्य वाटले.

सुबाभूळ शेतात लावल्यास कीड अथवा इतर खर्च राहत नाही आणि विशिष्ट आकाराच्या फांद्या तोडूनच द्यायच्या त्यामुळे वारंवार खर्चाचा प्रश्न राहत नाही. आपल्याकडे ऊस मोठया प्रमाणावर आहे. याचा उत्पादन खर्च, निगा आणि तोडणी या प्रक्रियेतून टनाला २ हजार पर्यंत आधिकतम भाव आहे. तुलनेत सुबाभूळ हा कारखाना ४ हजार रुपये टन खरेदी करते हे विशेष.

मौसमी हवामान आणि यात असणारी रिस्क कमी आणि भाव जास्त आहे. आंध्रप्रदेशात अनेकजण सुबाभूळाच्या शेतीकडे वळले आहेत. आपल्याही राज्यात असं शक्य आहे आणि जोखीम कमी करुन शाश्वत उत्पन्न देणारी ही शेती शक्य आहे या विचारातच मी कारखान्यातून भोजनासाठी बाहेर पडलो. - 

  • प्रशांत दैठणकर

  • एक ठिपका दर्जेदार शिक्षणासाठी..!



    चिमुकल्या शाळकरी हातांनी ` एक साथ नमस्ते ` म्हणत झालेलं स्वागत तर कुठे वर्गात शिरताच ` गुड मॉर्निंग सर, क्लॅप, क्लॅप, क्लॅप म्हणत टाळया वाजवणारे हात गणवेषात सज्ज मुलं आणि नेमकं आता काय होणार असा भाव चेह-यावर घेऊन उभी शिक्षक मंडळी त्यासोबत संस्थेचे पदाधिकारी. हे चित्र आहे शालेय पटपडताळणी दरम्यानचं .

    राज्यात ३ ते ५ ऑक्टोंबर या कालावधीत शालेय पटपडताळणीचा कार्यक्रम शासन निर्णयानुसार सुरु झाला. शाळांमध्ये शिक्षकांची पदे टिकवण्यासाठी विद्यार्थी संख्या वाढविण्याचा प्रकार रोखण्यासाठी हा निर्णय आहे.

    सकाळीच सर्व शाळांमध्ये शाळेच्या वेळेआधी अर्धातास ही पथके शाळांमध्ये दाखल झाली. त्याची तयारी आधीच्याच दिवशी झाली. शिक्षण विभागाला वगळून ही पडताळणी असल्यामुळे त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या. महसूल विभाग आणि शासनाचे इतर सर्व विभाग यांनी संयुक्तपणे पडताळणीस सहकार्य केले आहे.



    या कामी मोठ्या प्रमाणावर वाहने अधिग्रहीत करणे तसेच सर्वांना प्रशिक्षण देणे असेही याच पटपडताळणीचा एक भाग होता.

    सकाळीच आम्ही जिल्हाधिकारी जयश्री भोज यांच्यासह एका पथकात शाळांमध्ये फिरायला सुरुवात केली. यात काही शाळांचे पट बघितले. पट नव्याने लिहिले होते. तर काही ठिकाणी जून महिण्यात असणारी विद्यार्थी संख्या आणि ऑगस्टची संख्या यात फरकत दिसत होता.

    शिक्षक वर्गाला या पडताळणीचे कुतूहल आणि भिती आहे असे भाव त्यांच्या चेह-यावर दिसत होते. एका शाळेत सातव्या वर्गास इंग्रजी शिकविणा-या शिक्षिकेला अम्ब्रेलाचे स्पेलिंग लिहा असे सांगितले तर तिने ते ` ए ` या अक्षरापासून सुरु केले. त्यामुळे विदृयार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते की नाही याबाबत शासनाला वाटणारी चिंता रास्तच आहे हे स्पष्ट झाले. एक-दोन विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी नव्याने कालच गणवेष मिळाला असे त्यांनी सांगितले. एका वर्गात विदृयार्थ्यांचे नाव विचारुन घेतले आणि नंतर शिक्षकाला त्याचे नाव विचारले त्यावेळी दोन्ही नावं वेगळी असल्याचा उलगडा झाला.

    शाळा-शाळांमधून या निमित्ताने असणा-या किचनची सफाई करण्यात आलेली होती. काही शाळांमध्ये वर्गातच तांदळाची पोती ठेवलेली होती.शाळांमध्ये उपस्थिती दाखवण्यासाठी अनेक संस्थाचालक अक्षरश: आटापीटा करीत आहेत हे स्पष्टपणाने जाणवले.

    शासनाने नांदेड जिल्ह्यात प्रायोगिक पटपडताळणी केली त्यावेळी २० टक्के उपस्थिती बोगस असल्याचे उघडकीस आले.होते. शाळांमध्ये शिक्षकांचे वेतन व भत्ते तसेच शालेय साहित्य आणि माध्यान्ह भोजन यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर अनुदान देते. या प्रकारे २० टक्के बोगस विद्यार्थी आढळले तर शासनाचे थोडे थोडके नव्हे तर ५००० कोटी रुपये वाचणार आहेत.

    वर्धा जिल्हा छोटा असल्याने इथं एकाच दिवसात सर्व शाळांची पडताळणी एका दिवसात पूर्ण करण्यात आली. विद्यार्थ्यांना पुन्हा दुस-या ठिकाणी शाळेत बसू नये म्हणून त्यांच्या बोटांवर शाई लावण्यात आली. अशी शाई निवडणुकीत मतदारांना लावली जाते.

    बोटावरली ती शाई मुलं कौतुकानं बघत होती. हाच छोटासा शाईचा ठिपका येणा-या काळात त्यांना दर्जेदार शिक्षणाची सुरुवात करुन देणार आहे. असा विचार करतच बातम्या देण्यासाठी मी कार्यालयात परतलो.

  • प्रशांत दैठणकर 

  • सोमवार, 3 अक्तूबर 2011

    पोषण आहारातून समृध्दी


    सोमवार, ३ ऑक्टोबर, २०११

    वर्धा जिल्ह्यात ग्रामीण भागात आपल्या परिश्रमाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासोबतच स्वत:चा आर्थिक उंचावणारे अनेक बचतगट कार्यरत आहेत. यातील एक बचतगट म्हणजे वर्धा तालुक्यातील आलोडी गावाचा जागृती महिला बचतगट होय.

    दारिद्रय रेषेखालील महिलांचे जीवनमान सुखी व्हावे या उद्येशाने ऑगस्ट २००७ मध्ये गटाची सुरुवात झाली. दहा महिलांच्या या गटात आठ महिला दारिद्रय रेषेखालील आहेत. यांनी बचतीच्या माध्यमातून बँकेच्या मदतीने नुसता गृहोद्योग केला असे नव्हे तर अनेक सामाजिक उपक्रमांमधून गावात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.

    बँकेकडून कर्ज घेण्यासाठी डीआरडिए चे विस्तार अधिकारी डी.के.वरधणे यांची मदत झाली. त्यांना वर्धा येथील भारतीय स्टेट बँकेने १ लाख रुपयांचे कर्ज दिले. आपल्या विविध कामाच्या जोरावर गटाने गेल्या ३ वर्षात ८५ हजार रुपये कर्जाची परतफेड केली असून, आज मितीस गटाकडे ४० हजार रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध आहे.

    या गटाचे वैशिष्ट्य म्हणजे निर्मल ग्राम योजनेत सहभाग. प्रत्येक सदस्याच्या घरात शौचालय असलेच पाहिजे असा निर्णय घेऊन तो त्यांनी पार पाडला. या गटाला गावात शालेय पोषण आहार पुरविण्याचे काम मिळाले आहे. त्या माध्यमातून मुलांना सकस आहार आणि गटाला आर्थिक स्थैर्य लाभले आहे.

  • प्रशांत दैठणकर

  • शनिवार, 1 अक्तूबर 2011

    एकतेच्या शक्तीचे यश


    शनिवार, १ ऑक्टोबर, २०११

    आपल्याला नियमित आयुष्यात विविध गोस्टी लागतात. यासाठी आपण बाजारपेठेवर अवलंबून असतो. यात वेगळा विचार केला तर आपणच बाजारपेठ निर्माण करु शकतो आणि आपली आर्थिक स्थिती मजबूत करु शकतो. या विश्वासातून काम करणा-या सिंधी मेघे येथील एकता स्वयंसहायता महिला बचतगटाने मोठे काम उभे केले आहे.

    सिंधी मेघे हे वर्धेपासून पाच किलोमीटर अंतरावरील गाव आहे. येथे दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थन हे वैद्यकीय विद्यापीठ आहे. मोठ्या प्रमाणावर मुलं-मुली या भागात शिक्षणासाठी राहतात. त्यांच्या मेसच्या गरजा लक्षात घेऊन अनेक व्यवसाय इथं उभे राहिले आहेत.

    गावातील दारिद्रय रेषेखालच्या १३ जणींनी एकत्र येवून जानेवारी २००७ मध्ये बचतगटाची स्थापना केली. बँकेचे वित्तसहाय्य मिळाल्यावर उद्योग उभारायचा हे त्यांनी प्रारंभापासून निश्चित केले होते. गावात भोजनालये आणि हॉटेल्सना मसाले, तिखट, हळद अशा विविध पदार्थांची गरज असते.

    अर्थसहाय्य प्राप्त झाल्यावर गटाने कांडप यंत्र टाकण्याचा निर्णय घेतला. या रुपाने त्यांच्या घरात जणू लक्ष्मीचं आगमन झालं. आजवर बँकेचे ७० हजार रुपयांचे कर्ज पूर्ण परतफेड करुन त्यांनी व्यवसायाच्या जोरावर ५० हजारांचे खेळते भांडवल आणि कांडप यंत्र यासह प्रत्येक कुटुंबाला स्थैर्य अशी केलेली कमाई निश्चितपणे कौतुकास्पद अशीच आहे.

    बुधवार, 28 सितंबर 2011

    गृहोद्योगातून भरभराट


    बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

    इच्छा तेथे मार्ग असं म्हणतात ही उक्ती अतिशय सार्थ आहे. याचा प्रत्यय वर्धा जिल्ह्यातील केळझर इथल्या सावली स्वयंसहायता महिला बचत गटाच्या कामात येते. सेलू तालुक्यातील केळझर हे गाव इथल्या पांडवकालीन मंदिरांसाठी प्रसिध्द आहे. या गावात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातल्या १२ जणींनी एकत्र येवून ऑगस्ट २००७ मध्ये आपल्या एकीने यशाचा नवा अध्याय लिहिला.

    घरात लागणा-या शेवया-पापड्या, सरगुंडे आदींचे उत्पादन करणारा हा गट जिल्ह्यात प्रसिध्द आहे. तो त्यांच्या नाविन्यपूर्ण मार्केटींगसाठी जिल्ह्यात इतर बचतगट अशी उत्पादने विकत आहेत. मात्र सावली स्वयंसहायता गटाच्या महिला वैशिष्टपूर्ण पध्दतीने, आकर्षकपणाने स्टॉल सजवणे, गाडी लावली तर ती गाडी लक्षवेधी ठरेल अशी मांडणे अशा पध्दतीने विक्री करतात.



    बँकेचे ३५ हजारांचे कर्ज घेऊन त्याची पूर्ण फेड केलेल्या या गटाकडे ३५ हजारांचे खेळते भांडवल आज आहे. आपल्याला स्थैर्य आलं म्हणजे संपले असे न करता या गटातील महिलांनी गावात इतर महिलांना प्रेरित करुन इतर गटांच्या स्थापनेत मोलाचा वाटा उचलला आहे.

    सेलू पंचायत समितीचे विस्तार अधिकारी निमजे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मदतीने त्यांनी आपल्या आयुष्यातून गरिबीचा अंधार कायमचा दूर केला आहे. त्यांचे हे कार्य इतरांनाही प्रेरक ठरले आहे.



  •                                                                                                                                                             प्रशांत दैठणकर





  • मंगलवार, 27 सितंबर 2011

    वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे




    वर्धा जिल्ह्यात आष्टीला लागून पेठ अहमदपूर हे एक छोटेसे गाव आहे. त्या गावाची लोकसंख्या २९८२ आहे. गावामध्ये एकूण ५ गटाची स्थापना माविमच्या माध्यमातून झालेली आहे. त्यापैकी तेजस्विनी योजनेतंर्गत निर्मल गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. गटामध्ये एकूण १८ सभासद आहे. गटातील व्यवहार पाहून बँकेने गटाला रुपये १५००० चे कर्ज दिले. 

    कर्जाचा उपयोग महिलांनी घरगुती, शेतीच्या अडचणीकरिता केला. बँकेची ठरलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड केली. त्यामुळे गटाला बँकेनी दुसरे कर्ज ५०००० मंजूर केले. या रक्कमेतून गटाला कोणता उद्योग करायचा सुचत नव्हते. तेव्हा सहयोगिनीच्या मार्गदर्शनाने गटाने नर्सरी उद्योग करण्याचे ठरविले. त्याकरिता जागेची आवश्यकता होती. गटातील एका सभासदाकडे मोठा प्लॉट रिकामा होता. त्या ठिकाणी नर्सरी व्यवसाय होऊ शकतो असे लक्षात आल्यानंतर गटातील सभासद शांता धांदे या महिलेकडून नर्सरी उद्योग करण्याकरिता जागा वापरण्यास मंजूरी घेऊन गटाने नर्सरी उद्योग सुरु केला. 

    गटातील सर्व महिला मिळून स्वत:च्या प्रयत्नाने वनविभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले. त्यामुळे त्यांच्या नर्सरीमधील रोपांची चांगल्या प्रकारे वाढ झाली. नर्सरीमधील रोपांची रुपये २५००० ला विक्री करुन त्यांना रुपये १०००० चा नफा मिळाला. पुढे हाच उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु करण्याचा मानस बचतगटाचा आहे. त्याकरिता गटाने बँकेकडे प्रस्ताव सादर करुन कर्ज मंजूर करुन घेतलेले आहे.

    गटाने नर्सरी उद्योग निवडून पर्यावरणाच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. संत तुकारामांच्या ओवीनुसार वृक्षांना सुध्दा आप्तस्वकीयांप्रमाणे जीवनात स्थान दिलेले आहे.

    बिछायत व्यवसायाच्या माध्यमातून शिवाणी महिला बचत गटाची भरारी



    ग्रामीण व शहरी लोकांकडे होणा-या समारंभात किंवा किरकोळ स्वरुपाच्या कार्यक्रमांचे आकर्षण बिछायतीच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. गरीब असो की श्रीमंत असो प्रत्येकाच्या कार्यक्रमात बिछायतीचे साहित्य महत्वाची भूमिका पार पडत असते. शिवाणी महिला बचत गटाने चालविलेले बिछायत केंद्र परिसरात उत्तम सेवा देणारी ठरत असून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

    देवळी तालुक्यातील पुलगाव शहरालगत गुंजखेडा येथील वल्लभनगर येथे शिवाणी महिला बचत गट १ फेब्रुवारी २००८ रोजी स्थापन झाला. या बचतगटाने परिश्रमपूर्वक उत्तम कामगिरी केल्यामुळे पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामीण विकास यंत्रणेने दखल घेवून बिछायतीचे साहित्य खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला.त्यासाठी या महिला बचत गटाला १ लाख २० रुपयांच्या प्रस्तावाला मंजूरी प्रदान केली.


    या बचत गटाविषयी माहिती जाणून घेतांना शिवाणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती सुशिला कडू म्हणाल्या की, गावातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये बचतगटाविषयी मार्गदर्शन तत्कालीन ग्रामसेवक यांनी दिली. या बैठकीला मी आणि गटातील महिला आग्रहपूर्वक उपस्थित होतो. शंका कुशंका दूर झाल्यानंतर आम्ही महिला ३० जानेवारी २००८ रोजी माझ्याच घरी बैठकीचे आयोजन केले. त्या बैठकीमध्ये बचतगटाचे नाव बचतीसाठी रकमेचे निर्धारण आणि भविष्यात करावयाचा व्यवसाय याविषयी चर्चा करुन बचत गटाला शिवाणी असे नाव देण्याचे ठरविण्यात आले. मासिक ३० रुपये बचत करुन बिछायतीचा व्यवसाय सर्वानुमते निवडण्यात आला.

    बचत गटातील प्रत्येक महिलेने ३० रुपये बचत करुन १२ महिलेची एकत्रीत रक्कम गोळा केल्यानंतर लगेच तिस-या महिन्यात बँक ऑफ महाराष्ट्र पुलगाव येथे बचत गटाचे खाते उघडण्यात आले. प्रत्येक महिन्याला ३६० रुपये प्रामाणिकपणे भरण्यात येत होते. वर्षाला ४ हजार ३२० रुपये बँकेत जमा झाले. दुस-या वर्षाला मागील रकमेची जमा मिळून बचत गटाच्या खात्यावर ८ हजार ६४० रुपये जमा झाले. बचत गटातील महिला गरीब असल्यामुळे पदोपदी त्यांचे कुटूंबामध्ये पैशाची गरज भासत असते. ही गरज गटात जमा झालेल्या रकमेतून करण्यात येत असते. या बचतीच्या रकमेतून काही महिलांना आपला स्वत:चा वेगळा व्यवसाय उभारला तर काही महिलांनी कुटुंबातील सदस्याच्या पाठ्य पुस्तकासाठी तसेच औषधोपचारासाठी खर्च केला आहे.

    बचत गटातील सदस्य अनुसया गवळी यांनी फेब्रुवारी २०१० रोजी ६ हजार रुपये अंतर्गत कर्ज २ टक्के व्याजाने जुन्या ऑटोच्या रिपेअरींगसाठी घेतले. सदर्हू ऑटो त्याचे पती चालवित असून ऑटो पासून सर्व खर्च वजा जाता २०० रुपये प्रत्येक दिवसाला कमाई होते. आता पर्यंत ४ हजाराची परतफेड केली असून व्याज सुध्दा त्यांनी भरले आहे. 

    वनिता चुबलवार या सदस्या महिलेने गटातून ८ हजाराचे अंतर्गत कर्ज डिसेंबर २००९ रोजी धान्य व्यवसायासाठी घेतले होते. बचत गटातील प्रत्येक महिला त्यांच्या धान्य दुकानातून धान्य व इतर वस्तू खरेदी करतात तसेच हा व्यवसाय सुध्दा चांगल्या प्रकारे चालत असल्यामुळे त्यांचे कुटूंब या व्यवसायावर उपजिवीका चालवित आहे. उचल रकमेची सर्व रक्कम परतफेड केली असून अजून दुकानामध्ये ५१ हजाराचा धान्य साठा उपलब्ध आहे.

    सुशिला कडू या गटातील महिला सदस्यांनी ५ हजाराचे अंतर्गत कर्ज घेतले होते. त्यांनी महिला व पुरुषासाठी ब्युटीपार्लरचे दुकान उघडले. हे दुकान चांगले चालत असून त्यांचा मुलगा व मुलगी हे दुकान सांभाळतात. खर्च वजा जाता त्यांना ४ हजार रुपये सरासरी रक्कम प्राप्त होते. त्यांनी बचत गटाकडून घेतलेली कर्जाऊ संपूर्ण रक्कम दोन टक्के व्याजासह परत केली आहे.

    वर्षा सालंकार यांनी जून ११ मध्ये शेतीसाठी व साधना धांगडे यांनी दोन मुलांच्या शिक्षणासाठी ३ हजार रुपये कर्ज घेतले आहे. व्याजासह अद्यापही परतफेड सुरु आहे. बचतगटाच्या सदस्यांची अंतर्गत उलाढाल अद्यापही सुरु आहे.

    शिवाणी महिला बचत गटाने आगस्ट २०१० मध्ये बिछायत केंद्र उघडण्याचा प्रस्ताव बँक ऑफ महाराष्ट्र पुलगांव येथे सादर केला. बँकेनी जानेवारी २०११ ला १ लाख १० हजाराचे कर्ज दिले. लग्न समारंभ, वाढदिवस किंवा अन्य समारंभासाठी बिछायात केंद्रातील साहित्याचा उपयोग होत असल्यामुळे या व्यवसायाला परीसरात झळाळी प्राप्त झाली त्यामुळे आतापर्यंत ३३ हजार ६०० रुपयाची परतफेड बँकेला केलेली आहे. तसेच बँकेच्या खात्यामध्ये महिला बचतगटाचे १६ हजार रुपये शिल्लक असून परतफेडीमुळे बँकेत बचत गटाचा लौकीक वाढलेला आहे. अद्याप १ लाखाचे कर्ज बँकेकडून मिळावयाचे असून सदर्हू व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्याचा मानस अध्यक्ष सुशिला कडू व सचिव अनुसया गवळी यांनी बोलून दाखविला.

    या बचत गटाला प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहयोगीका शेख बहिदा यांचा मोलाचा वाटा असून उन्नतीच्या पथावर चालून शिवाणी महिला बचत गटाने उंच भरारी मारली आहे एवढे मात्र निश्चितच.

  • मिलींद आवळे 

  • गुरुवार, 22 सितंबर 2011

    बचतगटाचा दालमिल उद्योग

                 वर्धा जिल्हयातील कन्नमवार ग्राम हे गाव कारंजा तालुक्यातील कारंजा-वर्धा मार्गावर कारंजा पासून १८ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाची लोकसंख्या २००० च्या जवळपास आहे. गावामध्ये एकूण ११ बचत गट आहे, त्यापैकी ६ बचत गट माविमव्दारे स्थापन केलेले आहेत. त्यापैकी बहुउद्देशिय बचत गटाची स्थापना केलेली आहे. त्यापैकी ६ बचत गट माविमव्दारे स्थापन केलेले आहे.

    बहुउद्देशिय बचत गटाची स्थापना दिनांक ५ मे २००६ रोजी झाली. गटामध्ये १८ सभासद आहेत. गटातील सभासदांची मासिक बचत रुपये ३० असुन नियमित बचत करतात. गटाची प्रगती पाहुन गटातील सभासदांना उद्योजकता जाणिव जागृती प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामुळे गटातील सभासदांमध्ये उद्योग करण्याची आवड निर्माण झाली. 





                     गटातील सभासदाने दाल मिल व्यवसाय करण्याचे ठरविले. गटातील बहुतांश सभासद दारिद्र्य रेषेखालील असल्यामुळे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचा लाभ घेण्याचे ठरविले. गटाचे ग्रेडेशन होऊन गटाला रुपये २५००० कर्ज मिळाले. त्यातून गटाने ५० पोते ढेप खरेदी करुन गावात विकली. त्यापासून गटाला रुपये २००० नफा झाला.

                   बचतगटाने प्रथम कर्जाची परतफेड नियमित केल्यामुळे गटाला दुसरे कर्ज रुपये २००००० दालमिल व्यवसायाकरिता मंजूर झाले. त्यातून गटाला मिनी दालमिल खरेदी केलेली आहे. गटाला प्रती क्विंटल मागे रुपये २०० नफा मिळत आहे. या वर्षामध्ये गटानी तूर खरेदी करुन तुरदाळ विकण्याचा व्यवसाय करण्याचे ठरविले आहे. माविममुळे बचतगटाची प्रगती झाली आहे.

                                                                                               00000000

    बचत गटाने दिली साथ : संसाराला लागला हात




                       मी सौ. छाया प्रमोद थुल, हिन्दनगर, वर्धा येथील तपस्वी स्वंय सहाय्यता बचत गटाची सचिव म्हणून कार्य करीत आहे. गोडेगाव या छोट्याश्या गावात वास्तव्यास असणारे माझे कुटुंब, माझे वडील सांभाजी ढाले, आमची परिस्थिती फार गरीबीची होती. आमच्या कुटुंबात एकूण आठ सभासद आहेत, त्यात दोन भाऊ, चार बहिणी, मी तीन नंबरची मुलगी आहे.

                    माझे लग्न हिंगणघाट या गावी प्रमोद थुल यांच्याशी झाले. माझ्या सासरची परिस्थिती फार हलाखीची होती. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सासुरवास सुरु झाला. सोबत पतीही छळ करु लागले. माहेरचे स्वातंत्र्य हे काही दिवसातच संपले असे जाणवू लागले. घरातील मंडळी बाहेर कुठेही जाण्यास मनाई करायची, पती दारु पिऊन मला शिवीगाळ करायचे, मारायचे, टोचून बोलायचे, वाद करायचे ही रोजची दिनचर्या झाली होती. त्यामुळे माझी मानसिकता ढासळायला लागली. मला एक मुलगी आहे. मुलगी चार वर्षाची होईपर्यंत बराच त्रास सहन करावा लागला. परंतु आता आपल्या मुलीला भरपूर शिकवायचे आहे, हे माझे स्वप्न होते. त्या करीता पतीची साथ असणे गरजेचे होते. परंतु आपणच काही तरी काम करावे, म्हणून मी मुलीला घेवून हिंगणघाट वरुन वर्धा हिंदनगर येथे राहण्यास आली. मनात एक जिद्द होती की,आपल्या मुलीला चांगले शिक्षण द्यायचे.

                     एक दिवस मी माझ्या शेजारी राहणारी पवित्रा पाटील यांच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या घरी ब-याच महिला एकत्रित आलेल्या होत्या. माविमच्या सहयोगीनी महिलांना गटाची संकल्पना व माहिती सांगत होत्या आणि मी ते लक्ष देवून ऐकत होते. नंतर मी सहयोगीनीला विचारले की, मला सुध्दा गटात येण्याची इच्छा आहे. सहयोगीनीताई यांनी मला लगेच गटात समाविष्ट केले व गटातील सचिव या पदाची जबाबदारी मला देण्यात आली.

               नविन काही तरी शिकायला मिळणार ह्याच उद्देशाने मी होकार दिला व पुढाकार घेण्यास तयार झाले. माविम च्या सहयोगीनी यांच्या मार्गदर्शनाने मी बँकेचे व्यवहार उत्तमरित्या शिकली. यातून माझा आत्मविश्वास वाढला. गटाचे हिशेब बघणे व इतरही कामे करु लागली.

               मी लग्नापूर्वी शिवणकाम कोर्स केलेला होता. शिवणकाम मला चांगल्या प्रकारे येत होते. मी गटाकडून कमी व्याज दराने कर्ज घेतले व शिलाई मशिन खरेदी करुन शिवणकाम सुरु केले. आता माझा शिवणकामाचा उद्योग चांगल्या प्रकारे सुरु आहे. उद्योगामुळे मला पैसे मिळू लागले आणि घरच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली.

                 त्यामुळे माझे पती व इतर सासरतील मंडळीचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदललेला आहे. माझ्या मुलीला चांगल्या शाळेत पाठवू शकले. त्याच प्रमाणे घर खर्चात हातभार लावीत आहे. बचतगटामुळेच माझा शिवणकलेचा उद्योग भरभराटीस आला. त्यामुळे माविम व सहयोगिनींचे मनापासून आभार मानते. बचतगटाने दाखविलेले आशेचे किरण, कष्टानेच वळविले माझे जीवन.

                                                                                                                0000000000

    शनिवार, 17 सितंबर 2011

    बचतगटातील पाच महिलांचे सक्षमीकरण




    वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील गुंजरखेडा येथील रमाबाई महिला बचत गटांनी आपला आत्मविश्वास दृढ करुन श्रम शक्तीला सर्वोत्तम प्राधान्य दिले. त्यामुळे या बचत गटातील पाच महिलांनी अंतर्गत कर्ज घेवून जीवनमान उंचाविण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून सक्षमिकरणाकडे वाटचाल करीत आहे.

    गुंजरखेडा हे गाव पुलगाव ते आर्वी या रस्त्यावर असून, या गावाची लोकसंख्या दोन हजाराचया वर आहे. येथील दारिद्र्य रेषेखालील १५ महिला एकत येऊन त्यांनी २२ जानेवारी २००३ रोजी रमाबाई महिला बचत गटाची स्थापना केली. तत्पूर्वी या गटाची पहिली बैठक २५ डिसेंबर २००२ रोजी संपन्न झाली होती त्या बैठकीत बचत गटाच्या नावा सोबतच अनेक ठराव घेण्यात आले होते. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून प्रतिभा अनिल इंगळे व सचिव म्हणून वनिता गौतम सिंगनापूरे यांच्या नावाची निवड करण्यात आली.

    बचत गटाची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर अध्यक्ष श्रीमती इंगळे म्हणाल्या की रमाबाई बचत गटातील सर्वाधिक महिला ह्या दारिद्र रेषेखालील आहेत. पुरेसे शिक्षण नसलेल्या बचत गटाच्या महिलांमध्ये जबरदस्त असा आत्मविश्वास आहे. बैठकीत ठरल्याप्रमाणे रु. ३० मासीक वर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली. रमाबाई महिला बचत गटाच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र पुलगाव येथे बचतीचे खाते उघडण्यात आले. दोन वर्षात १० हजार ८०० रुपये जमा झाली. या रकमेतून सदस्यांना अंतर्गत कर्ज २ टक्के व्याजावर देण्यात आले. तसेच कर्जाऊ रकमेचे नियमित परतफेड बचत खात्यात जमा होत असल्याने बचत गटाची प्रामाणिकता पाहून १२ जानेवारी २००५ मध्ये महाराष्ट्र बँकेने १५ हजाराचे कर्ज गटाच्या अंतर्गत उलाढाली साठी मंजूर केले.

    या बचत गटातील पाच महिलांनी स्वत:चा व्यवसाय उभारला त्यामध्ये नंदा ठाकरे या महिलेनी दोन हजार रुपये कर्ज घेवून बांगड्या व स्टेशनरीचा फिरते व्यवसाय प्रारंभ केला. या व्यवसायातून त्यांना महिन्याला किमान ३ हजार रुपये नफा होत आहे. 

    मंजू शेंडे या महिलेनी ५ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांनी टेलरींगचा व्यवसाय स्व:ताच्या घरी सुरु केले. या व्यवसायाला परिसरात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने त्यांना सुध्दा महिण्याला ४ हजार रुपये शुध्द लाभ मिळत आहे. 

    शालू वडकर या महिलेचा गावातच हॉटेलच्या व्यवसायासाठी ५ हजार रुपये कर्ज दिले. गावातील मुख्य रस्त्यालगत एकच हॉटेल असल्यामुळे व्यवसायात प्रगती सुरुच असून सर्व खर्च वजा जाता किमान ६ हजार रुपये निव्वळ नफा कमवित आहे. 

    मेंढे या महिलेनी लेडीज गारमेंटचा व्यवसाय स्विकारुन प्रगती साधली आहे. त्यांना सुध्दा महिन्याला ३ हजार ५०० रुपये खर्च वजा जाता शुध्द लाभ मिळत आहे. 

    या बचत गटाला आंगणवाडीचा आहार पुरविण्याची निविदा मंजूर झाली. त्यांचे संचलन वर्षा खडसे यांना बचत गटाच्या सदस्याला देण्यात आल्यामुळे त्यांना सुध्दा महिन्याकाठी ९०० रुपये मिळत आहे.

    छाया खोब्रागडे या महिलेने एक हजार रुपये कर्ज घेतले त्या रकमेतून एक म्हैस घेवून दुग्ध व्यवसाय करीत आहेत.त्यांचा व्यवसाय प्रगती पथावर असल्यामुळे आता त्यांच्याकडे ४ म्हशी झाल्या आहेत. त्यांना सुध्दा सर्व खर्च वजा जाता किमान ७ हजार रुपये नफा मिळत आहे.

    बचत गटाचा मूळ व्यवसाय साड्या विक्रीचा होता. प्रत्येक महिलेला कर्जाउ रक्कम दिल्यामुळे त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. कर्जाऊ घेतलेली रक्कम टप्प्याटप्प्याने व्याजासह बचत गटाला परतफेड केली आहे..

    साडयाच्या व्यवसायात वंदना बोरकर, मंगला इंगळे, अंजिता कळमकर, वनिता सिंगणापुर, प्रतिमा इंगळे व मंजू शेंडे कार्य करत आहेत. गटातील महिला त्यांच्या परिसरातील गावोगावी जाऊन घर भेटीतून साड्यांची विक्री करीत असतात. त्यांचे परिश्रम वाया जात नाही. उलट त्यांच्या साड्याच्या विक्रीतवाढ सुध्दा होत असते. महिन्याला साड्याच्या विक्रीपासून ६० हजार मिळतात. विक्रीवर २० टक्के कमीशन मिळत असल्याने बचतगटातील ६ महिलांना किमान २ हजार रुपये मिळत आहे असे अध्यक्ष श्रीमती इंगळे यांनी सांगितले.

    बचत गटातील महिला त्यांच्या व्यवसाला पारंगत होत असून, त्यांनी त्यांच्या कुटूंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या व्यवसायाला त्यांनी वाहून घेतले आहे.

    अंतर्गत कर्जासाठी बचत गटाने घेतलेली १५ हजार रकमेचा बँकेला परतफेड केल्यानंतर ८ जानेवारी २००७ रोजी पहिला हप्ता ८३,६६२ रुपयाचा, दुसरा हप्ता १६ एप्रिल २००७ रोजी ८४८५ रुपयाचा व तिसरा हप्ता २६ डिसेंबर २०१० रोजी ४८ हजार रुपये असे एकूण २ लाख २० हजार रुपये बँकेने व्यवसायासाठी दिले असून, ४ हजार रुपयाचा विमा सुध्दा बँकेने काढला आहे.

    कापड व्यवसायासाठी मिळालेल्या रकमेतून महिलांसाठी साड्या, लुगडी, ड्रेस मटेरीयल, धोतर, लुंग्या इत्यादी बाजारातून घेण्यात आल्या असून ह्या वस्तू घरोघरी जाऊन बचत गटाच्या महिला विक्री करीत आहेत. विक्री झालेल्या माला नंतर नविन माल खरेदी केल्या जात असून, व्यवसाय उत्तम सुरु असल्याची ग्वाही श्रीमती इंगळे यांनी दिली.

    सोमवार, 12 सितंबर 2011

    स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर जनजागृती होणे गरजेचे - राज्यमंत्री राजेंद्र मुळक



    राज्यात स्त्रीभ्रूण हत्या हा विषय शासनस्तरावर अतिशय गांभीर्याने हाताळला जात आहे. या विषयासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासोबतच सोनोग्राफी केंद्रावर धाडी घालून याला अटकाव करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्याचे वित्त व नियोजन, उर्जा,जलसंपदा, संसदीय कार्य आणि उत्पादन शुल्क राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी या विषयात संवेदनशील पध्दतीने काम सुरु ठेवले आहे. याबाबत त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

    प्रश्न :- स्त्रीभ्रूण हत्या हा विषय आपण कसा हाताळता आणि त्यात आजवर आपण काय काम केले आहे?
    उत्तर :- मुळात स्त्रीभ्रूण हत्या हा विषय संवेदनक्षम आहे. आपण राजस्थानात किंवा उत्तरेत असा प्रकार घडतो असं मानत होतो. परंतु आपल्या राज्यातही थोड्याफार फरकाने ही स्थिती आहे हे नुकत्याच झालेल्या काही प्रकरणांवरुन दिसतय. नियोजन खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम करताना आकडेवारी सातत्याने समोर येते. यामध्ये मुलींचं दर हजारी प्रमाण खूपच कमी आहे. हा केवळ एक आकडा नसून गंभीर, सामाजिक प्रश्न आहे हे माझ्या लक्षात आलं.

    मुलींचे दरहजारी प्रमाण वाढवावयचे असेल तर समाजात जागृतीसोबत या संबंधाने असणा-या कायद्यांचे पालन हे दोन पैलू आहेत. या दोन्ही कडे तितक्याच प्रमाणात मेहनत घ्यावी लागणार आहे. असं मला वाटतं.

    प्रश्न :- यामुळे समाजात काही प्रश्न निर्माण झाले आहेत असं तुम्हाला वाटतं का?
    उत्तर :- निश्चितपणे. नुसते प्रश्न निर्माण झाले आहेत असं नव्हे तर गांभीर्याने या क्षेत्रात काम झाले नाही तर येणा-या काळात समाजाची संरचना बदलेल इतके दूरगामी परिणाम होतील. दर हजारी १०० मुलींची तफावत म्हणजे काही वर्षांनी दहा टक्के मुलांना अविवाहित राहण्याचा प्रसंग निर्माण होवू शकतो.

    प्रश्न :- मुलगाच पाहिजे असा हट्ट का धरला जातो?.
    उत्तर :- ही सामाजिक धारणा बनलीय आणि ती पूर्णपणे चुकीची आहे असं माझं मत आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असं समाजात मानलं जातं. आज मुली देखील सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नेत्रदीपक कामगिरी करताना दिसतात. कार्पोरेट जगत असो की क्रिडाक्षेत्र सर्वच क्षेत्रात मुलींचे स्वत:चे असे स्थान निर्माण केल्याचे आपणास दिसते अशा स्थितीत मुलालाच वंशाचा दिवा मानणे चुकीचे आहे असं मला वाटतं.

    प्रश्न :- मुलींचे प्रमाण कमी होत आहे या मागची कारणं काय वाटतात?
    उत्तर :- आपल्या सामाजिक रुढी परंपरा याला निश्चितपणानं जबाबदार आहे. कायदा करण्यात आला असला तरी त्यातून पळवाट शोधून हुंडा मागितला आणि दिला जातो. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे सांगता येत नाही असं कुठेतरी मी वाचलं होतं. मुलगा कसाही निघाला तरी घसघशीत हुंडा मात्र मिळवता येतो अशी धारणा समाजात आहे. हुंडा आवाक्याच्या बाहेर जात आहे आणि मुलगी झाली तर हुंडा कुठून आणायचा या भितीने अनेकजण स्त्री भ्रुण हत्‍त्‍या आणि गर्भजल चिकित्सा या मार्गांकडे वळत आहेत.


    प्रश्न :- ही परिस्थिती बदलण्यासाठी काय उपाय करता येतील ?
    उत्तर :- या परिस्थितीला बदलण्यासाठी जनप्रबोधन आणि कायद्याची कडक अंमलबजावणी हे दोन मार्ग आहेत. जनप्रबोधन आणि प्रोत्साहन यातून समाजाला स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यापासून परावृत्त करता येईल आणि समाजाला चांगली सकारात्मक संदेश देखील पोहोचेल. मी वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. स्वातंत्र्य दिनी वर्धा येथे एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेणा-या महिलांचा शासनातर्फे आम्ही सत्कार केला. समाजात असे चांगले वागणारे लोक आहेत हे दाखवून दिले तर या मार्गावर इतरही लोक निश्चितपणाने येतील. अशा प्रकारचा उपक्रम राज्यात सर्वत्र करण्यात येत आहे.

    प्रश्न :- कायद्याच्या अंमलबजावणी बाबत काय करीत आहात?.
    उत्तर :- गर्भजल लिंग निदान चाचण्यांना रोखण्यासाठी शासनाने कायदा केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात याची अंमलबजावणी व्हावी यासाठी समित्यांचे गठण करण्यात आलेले आहे. या माध्यमातून सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी तसेच अचानक तपासणी करण्यात येत आहे. राज्यात ज्या केंद्रांचा व्यवहार संशयास्पद वाटला अशी केंद्र सिल करण्यता आली आहेत.
    गर्भलिंग तपासणी करताना सापडलेल्या डॉक्टरांवर कठोर शिक्षा होईल अशी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामुळे स्त्रीभ्रूण हत्या प्रमाण निश्चितपणाने घटत जाईल असं असलं तरी समाजानं या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष दिल्या खेरीज हा प्रकार पूर्णपणे बंद होईल असं चित्र नाही.

    प्रश्न :- याखेरीज आणखी कोणते मार्ग आपण हाताळत आहोत ?
    उत्तर :- यात प्रबोधन मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे हे स्पष्टच आहे. गणेशोत्सव आणि नवरात्री महोत्सव काळात सार्वजनिक मंडळांनी याविषयाला अनुसरुन देखावे सादर करावेत असा प्रयत्न आम्ही करीत आहोत. या काळात मोठ्या प्रमाणावर देखाव्यांसोबतच पथनाट्य आणि गाण्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश पोहचविण्याचेही नियोजन आहे. यात टिव्ही चॅनेल्स, आकाशवाणी तसेच खाजगी एफएम वाहिन्यांचीही मदत घेतली जाणार आहे.

    स्त्रीभ्रूण हत्या हा समाजाला लागलेला कलंक आहे. हा मोठा सामाजिक भ्रष्टाचार देखील आहे. याविरुध्द जनशक्ती एकत्र व्हावी आणि हे प्रकार संपून पुन्हा मुलींचे दरहजारी प्रमाण हजारापर्यंत यावे यासाठीच हे प्रयत्न सुरु ठेवणार आहोत.

  •                                                                                                                                                                          प्रशांत दैठणकर

  • मंगलवार, 30 अगस्त 2011

    यशस्वी उद्योजिका




    एकदा मला माझ्या घरच्या कामाकरिता तीन हजार रुपयाची गरज पडली. तेव्हा वार्डातील एका महिलेकडे गेले, तेव्हा तिने मला पैसे दिले पण पाच टक्के व्याजानी, तिच्या जवळील पैसे बचत गटाचे होते तेव्हा कुठे माझ्या लक्षात आल की, बचत गट तयार केला तर आपल्याला बरेच फायदे मिळू शकतात. मी बचत गट तयार करावा हा विचार घेऊन, वार्डातील काही महिलांकडे गेले आणि माझ्या मनामध्ये येणारा विचार त्यांना सांगितला .सर्वांच्यामते आपण सुध्दा आपल्या वार्डात महिला बचत गट तयार करायचा निर्णय घेतला. 

    आम्ही माविम सहयोगीनींनी वर्षाताईची भेट घेतली. त्यांनी आम्हाला बचत गटाचे फायदे आणि महिला आर्थिक विकास महामंडळ याचे कार्य सांगितले व पटवून दिले. आम्ही महिलांनी त्याच दिवशी म्हणजे १ ऑगस्ट २००८ ला बचत गटाची स्थापना केली, आणि इतर गटाची चौकशी केली. तेव्हा असे लक्षात आले की, महिला फक्त आपसात कर्ज व्यवहार करतात पण बँकेकडून जे कर्ज मिळते त्याचा वेगळा काही फायदा घेत नाही. आम्ही टी.व्ही रेडीओ वरील कार्यक्रम बघायचो, तेव्हा खेड्यातील महिला बचत गटाची शेती, दूध व्यवसाय, पोल्ट्रीफार्म, शेळी व्यवसाय अशी कितीतरी कामे करतात आणि संसाराला मदत करतात.

    आम्ही दर महिन्याच्या दोन तारखेला बचत गटाची मिटींग घेत असतो.एका बैठकीच्या वेळी कोणता व्यवसाय सुरु करावा याविषयी आम्हा सदस्यांची चर्चा चालू होती. तेवढ्यात वर्षा या महिलेचा फोन आला त्यांनी आम्हाला सांगितले की, तुमच्या वार्डात उद्योजकता आणि उद्योग कसे करायचे याचे ४ दिवसाचे प्रशिक्षण आहे. तुम्हाला प्रशिक्षणाला यायचे आहे. 

    आमच्या गटातील ६ महिला प्रशिक्षणाला गेल्या, आम्हाला उद्योग उभारणीतील विविध टप्पे, उद्योगाची निवड, बाजारपेठ पाहणी, शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच महिलांची व्याख्या सांगितली. त्यात म म्हणजे महत्वाची, हि म्हणजे हिम्मतवाली, ला म्हणजे न लाजता सामोर जाणारी ही संपूर्ण माहिती वर्षा आणि धवने यांनी चार दिवसाच्या प्रशिक्षणातुन दिली आणि प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवसापासून आमचा नविन जन्म झाला.

    बचतगटाच्या माध्यमातून आपण खुप काही करु शकतो आणि त्याच आठवड्यात आम्ही तीन ते चार महिलांनी मिळून साबुदाना पापड, आलू पापड, मुंग पापड, गव्हाचे पापड, ज्वारीचे पापड अशा प्रकारचे पापड तयार केले. पुन्हा आम्ही वर्षाताईला भेटलो. त्यांनी विक्रीची माहिती दिली. आम्ही आफिस मध्ये गेलो. तिथे राठोड सर, देशमुख मॅडम, कांबळे मॅडम यांनी सुध्दा आम्हास प्रोत्साहन दिले. तयार केलेला माल घरोघरी, दुकानात, कार्यालयात जाऊन विक्री केली. तयार केलेला माल अगदी १५ दिवसात संपला. आम्हाला फार आनंद झाला. पाच हजार रुपये लावून तयार केलेला माल अगदी आठ हजार रुपयाला विकला. त्यातुन गटाला तीन हजार रुपयाचा नफा झाला. आम्हाला खुप आनंद झाला. जो माल ज्या ग्राहकांना दिला ते ग्राहकसुध्दा खुपच आनंदीत झाले.

    राठोड सरांनी आम्हाला फोन करुन कळविले की, पुलगांव येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. म्हणून पापडांचा माल तयार करा व प्रदर्शनात विक्रीस ठेवा. अगदी पाच दिवसात आम्ही शंभर किलो पापडांचा माल तयार केला. ६ दिवसांच्या प्रदर्शनामध्ये पंधरा हजार रुपयाचा माल विकला गेला. तिथे आम्हास सात हजार रुपयाचा नफा मिळाला. 

    सरांनी फोन करुन कळविले की, आता तीन-चार ठिकाणी प्रदर्शन आहेत. त्या करिता तुम्ही तयारीत रहा. माल तयार करण्याकरीता आम्ही बाहेरच्या महिला कामाला लावल्या व सगळया प्रदर्शनांमध्ये सहभागी झालो प्रत्येक व्यक्तींनी मालाची प्रशंसा केली आणि मालाची विक्री वाढली. आम्हाला बँकेकडून ५०,००० रुपयाचे कर्ज मिळाले. 

    आता आम्ही मशिन घेऊन कामाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला नागपूर वरुन मशिन आणली मशिन व्दारे दाळ, तीखट, मसाले, धनिया, हल्दी, सोजी सगळे साहित्य करु लागलो.

    या वर्षी आम्ही पालक वडी, मेथी वडी, लौकी वडी, मसाला वडी, मुंग वडी, उडद वडी, आणखी बरेच पदार्थ तयार करुन दिल्लीला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याच्या प्रदर्शनात सहभागी झालो. तिथे तर मला खरोखरच स्वर्ग बघायला मिळाला. भारतातील सर्व राज्यातील महिला आपआपल्या वस्तुची विक्री करत होत्या. त्यामध्ये माल विकायचा कसा ? त्यांनी बनविलेला मालाचा दर्जा, पॅकिंग इत्यादी त्यांच्या मधील कौशल्य पाहून मन अगदी प्रसन्न झाले.

    त्यांच्याशी प्रत्यक्षात चर्चा केली. त्यांनी तयार केलेला मालाचा दर्जा, विक्री कौशल्य, ग्राहकांशी प्रेमाने हसुन अगदी आत्मविश्वासपूर्पक माल कसा विकायचा सगळे शिकायला मिळाले. पुर्ण भारताचे दर्शन त्या ठिकाणी झाले.

    पहिल्यांदाच इतका लांबचा प्रवास केला होता. १५ दिवसात दिल्लीला राहिल्यानंतर आम्ही तीन दिवस आगरा, मथुरा, वृंदावन, ताजमहल, संपूर्ण दिल्ली दर्शन केले. घराबाहेर पडल्यानंतर खरी माणसाची किंमत माहिती होते. आणि जगण्याचा नवीन मार्ग सापडतो. दिल्लीला पंचेचाळीस हजार रुपयाचा माल विकला गेला. फक्त ६ दिवसात नंतरचे दिवस मी बाकी महिलांचा माल विकुन दिला. आम्ही महिला घराच्या कधी बाहेर निघू शकलो नाही ते आज सर्व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यामुळे घडू शकले.

    दर्शना महिला बचत गटामुळे १५ ते २० महिलांना काम मिळाले. प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिलेला ३ ते ४ हजार रुपयाचा नफा मिळतो आहे. त्यामुळे घरात आणि समाजात सुध्दा मानसन्मान मिळाला आहे.

    रविवार, 28 अगस्त 2011

    संधीचं फळ


                 कल्पना ही शहरामध्ये राहत होती. ती पाच भावंडामध्ये एकटी एकच बहीण होती. ती कुटुंबात खूप लाडाची होती. अभ्यासामध्ये खूप हुशार होती. तिला पुढे शाळा शिकायची होती. परंतु तिच्या आई वडिलांना तिच्या लग्नाची फार चिंता लागलेली होती आणि शिकत असताना तिच्या आई वडिलांनी तिच्या लग्नाकरीता स्थळ शोधने चालू केले होते. एक स्थळ जाम ते नागपूर ह्या रोडवर कानकाटी गाव आहे. त्या गावाची लोसंख्या ७४२ आहे. छोट्याशा गावात राहणारे सुभाष यांच्या कुटुंबाने कल्पनाला मागणी घातली होती. सुभाष स्वभावाने अतिशय चांगला व निर्व्यसनी होता. त्याच्याकडे स्वत:ची थोडी फार शेती होती. सुभाष बरोबर तिचे लग्न झाले. ती शहरातील खेड्यात आली. शहराच्या वातावरणात राहणारी कल्पना खेड्याच्या वातावरणात समरस झाली.ती खूप समजदार होती. तिला स्वत:वर आत्मविश्वास होता. तिच्यामध्ये खूप जिद्द होती. ती स्वत:च्या कल्पनेतुन स्वत:ला स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करित होती. तसेच ती इतर महिलांना स्वावलंबी होण्यासही माग्रदर्शन करीत होती. ती इतर महिलांशी खूप आपुलकीने प्रेमाणे वागायची तिच्या ममतेचा सागर होता. तिला वाट होती संधीची !

    अशातच एक दिवस         माविम सहयोगीच्या माध्यमातून कानकाटी येथे संधी चालून आली. माविमचं काम म्हणजे आकाशात उंच भरारी मारुन प्रगतीच्या वाटेवर महिलांना उभं करणारी मावि सहयोगिनी ! आम्हा सर्व महिलांना बचत गआची संकल्पना, महत्व सांगून गावामध्ये बचत गटाची स्थापना केली. गआमध्ये कल्पनाला सचिव पदावर काम करण्याची संधी मिळाली. गटाच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन मिळत होते. गट सुरळीत सुरु होता. त्यामध्ये गटातील सभासदांनी अंतर्गत कर्ज व्यवहारातुन आर्थिक स्त्रोत वाढविले. तसेच कल्पनाने सुध्दा गटातुन कर्ज घेतले. तिने घेतलेल्या कर्जातून फोटो फ्रेमिंगचा व्यवसाय सुरु केला. कारण तिच्या मध्ये ह्या व्यवसायाची कला अवगत होती. तसेच तिने पेंटींग क्लास सुध्दा केला होता.

               कल्पना ही ख्ररोखरचं कल्पनावंत होती. तिने आपल्या कल्पनेतून नाविन्यपूर्ण पिंपळाच्या पानावर कोरीव काम करुन महान व्यक्तीची फोटो पिंपळाच्या पानात तयार केले. ते दिसायला अतिशय सुंदर व नाविन्यपूर्ण असल्यामुळे त्याची मागणी खूप वाढली. त्यामुळे व्यवसायातून कल्पनाच्या आर्थिक परिस्थितीत बरीच सुधारणा झाली. तसेच ह्या व्यवसायामध्ये तिचा नवरा सुध्दा तिला संपूर्ण सहकार्य करीत होता. हा व्यवसाय कल्पनेतून निवडण्यात आला. ती स्वत:चा व्यवसाय सांभाळून इतर सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन मोठ्या उत्साहने इतर महिलांना मदत करते. स्वत:च्या प्रेरणेतून इतरांना सुध्दा कार्य करण्यास प्रेरणा देते.

                                                                                                0000000

    गुरुवार, 25 अगस्त 2011

    आधारस्तंभ


    गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

    एकदा सायंकाळी एका खेड्यावरुन परत आल्यावर अचानक शेजारी राहणा-या ममताकडे सहज नजर टाकली. घरासमोरच राहत असल्यामुळे ममता ही नवी सून असली तरी मोजकच नकळत हसली. मला तिच्या हसण्यानं सुध्दा ती खूप काळजीत असल्याचे जाणवले. काही न बोलता मी घरात आले.

    मी घरी येऊन नंतर कामानिमित्त बाहेर गेले, पण डोळ्यासमोर ममताचा चेहरा
    थोड्या-थोड्या वेळाने येत होता. नेहमी हसणारी, हसून स्वत:हून बोलणारी ममता आज इतकी अबोल का ? एकच प्रश्न सतत पडत होता.

    ममता ही व्दारकाताईची मोठी सून असल्यामुळे ती घरातसुध्दा तेवढ्याच जबाबदारीने वागायची.हसतमुख राहून सर्वांची मर्जी राखायची. एक दीर, आजी, सासू-सासरे असा तिचा परिवार.निलेश नेहमी नवरा या नात्याने ममताची काळजी घ्यायचा. घरातील सगळया व्यक्ती खूप समजदार असताना ममता काळजीत का? हा प्रश्न मला दुस-या दिवशीपर्यंत सतावीत होता.

    व्दारकाताई ह्या सोनिया गटाच्या सहसंघटिका होत्या. गटाची आपण मिटींग घ्यावी व ममताला बोलके करावे, म्हणून दुस-या दिवशी सायंकाळी ठरल्याप्रमाणे हनुमान मंदीरात सोनिया गटाची मिटींग घेण्यात आली. मिटींगला सुरुवात करताना सर्व महिलांकडे बघितले त्यात ममता कुठेच दिसत नव्हती. चौकशी करुन तिला बोलावण्यात आले. तेव्हा सुध्दा मोजकसं हसून गटात सभेला बसली.संधी बघून मी तिच्याजवळ गेली. तुला बरे नाही का ? काय होत आहे ? असे विचारुन बोलके केले, ती म्हणाली,काहीतरी काम पाहिजे.

    मी आश्‍चर्याने बघितले व मनात एवढा महत्वाचा प्रश्न, पण स्वत: त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नात असणा-या ममताचे मला कौतुक वाटले. माझ्याकडे अपेक्षेच्या नजरेने बघून मला गटाच्या माध्यमातून काही काम मिळेल काय.मला कामाची फार आवश्यकता आहे, असे ती म्हणाली. या प्रश्नानी मी विचारात पडले. कारण ममता मध्यमवर्गीय कुटुंबातली, निलेश सुशिक्षित बेरोजगार पण काहीतरी करण्याची धडपड, कर्ते सासरे सेवानिवृत्त झालेले. एकूण कुटूंब तसं मोठंच पण मी तिला काहीही न दर्शवताच आपण बघू विचार करु, तू अशी हिंमत हारु नकोस, या शब्दांनी तिला हिंमत आल्याचे तिच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होते. पण ममताला धीर कुठे होता, मी दुस-या गटाकडे जेव्हा काही कामानिमित्त गेली असता, तिथे ममता मला बोलवण्याकरीता आली व म्हणाली, काकू आमच्या गटाच्या काही महिला माझ्या घरी बसल्या आहेत, तेव्हा तुम्ही आलात तर बरे होईल. मी सुरु असलेले काम आटोपून जेव्हा सोनिया गटाकडे गेली, तेव्हा सर्व सभासद तर नव्हते पण पाच ते सहा महिला मला दिसल्या त्यांना बघून बरे वाटले की आता माझ्या मनात कालपासून जे थोड्या फार प्रमाणात ममताबद्दल सुरु आहे. त्यासाठी या सगळ्यांची आपल्याला मदत होणार. ममताचा पुन्हा प्रश्न तोच ताई सांगा ना गटाच्या माध्यमातून मी काही करु शकणार नाही का ?

    मी तिला म्हटले की, ममता मी एक आयडिया तुला देते, तू खानावळ का लावीत नाहीस. आपल्या शेजारी आजूबाजूला कर्मचारी आहेत आणि विद्यार्थी सुध्दा आहेत. तू जर मेस सुरु केली तर तुझे घराकडे लक्ष राहील, घरच्या घरी तुला काम पण मिळेल. हे बघ तुला काम मिळेल आणि त्यांना चांगले घरगुती जेवण मिळेल. बघ विचार करुन, त्यावर ममता म्हणाली की, मेस लावायची तर आधी धान्य सामान नको का भरायला. त्यासाठी आर्थिक मदत हवी. तेव्हा गटाच्या महिलांनी तिला गटातून कर्ज स्वरुपात मदत करण्याचे ठरविले.

    दुस-या दिवशी तिची सासू एक दोन व्यक्तीकडे जावून विचारुन आल्या की, घरगुती खाणावळ तुम्हाला हवी का ? मी सुध्दा बँकेच्या कर्मचारी लोकांना आग्रह धरला. बघता बघता ममताच्या मेसच्या जेवणाचे कौतुक सर्वत्र पसरले. आज ममता, तिच्या सासूबाई सुध्दा खूप मेहनतीने खानावळ चालवतात. निलेशला कंपनीत नोकरी लागली, ममता म्हणाली,खानावळसाठी मला गटाने सहकार्य केले नसते तर मी आज काहीच करु शकले नसते. खरचं गटचं माझ्यासाठी खरा आधारस्तंभ ठरला आहे. ममताला समाधान मिळाल्याचे तिच्या बोलण्यात आणि उत्साहातून दिसत होते.

                                                                                                          0000000

    मंगलवार, 23 अगस्त 2011

    संघर्षमय जीवनातून नवचैतन्य


    मी अर्चना गणवीर समुद्रपूर तालूक्यापासून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या गिरड या गावामध्ये राहते. माझा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर गावामध्ये झाला. आमच्या भावंडामध्ये मी सर्वात लहान, वडील व्यसनी, कुटूंबाचा संपुर्ण भार आईवर होता. मोठ्या बहिण्ीचे लग्न झाले. आई घरी शिवणकाम करायची, मी सातव्या वर्गापासून आईच्या कामाला मदत करायला सुरुवात केली. मी आईच्या कामात मदत करता करता पदवी पर्यंतचे शिक्षण व शिवणकाम शिकले.घरच्या लोकांनी माझे लग्न उमरेड तालुक्यातील एका मुलाशी करुन दिले.
    माझा नवरा सारा पगार दारुत घालवायचा, मला मारण्याकरीता नवनवीन कारणे शोधायचा.मी मरत मरत जगत होती, पण नंतर मी ठरवलं, माझ्या चांगल्या आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी मलाच कंबर कसावी लागेल. माणुस म्हणुन चांगलं जीवन जगण्याचा मलाही अधिकार आहे. माझ्या अंगी शिवणकामाचं चांगलं कौशल्य होतं. मनाशी निर्धार व स्त:वर आत्मविश्वास होता.मी व्यसनी नव-यास सोडले
    गिरडला एका संस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथलं काम संपवुन घरी कपडे शिवण्यास सुरुवात केली. पैसे गोळा व्हायला लागले. पण तिथेही फसवणुक झाली. संस्था बंद पडली, पण माझा शिवणकाम व्यवसाय चांगला चालत होता. एकट्या बाईला विरोधही खुप असतात. मला इथुन काढण्याचा खुप प्रयत्न केला. पण मी आपल्या मनाशी खंबीर होते. स्वत:चा टिकाव केला.
    माझं लग्न झालं आहे. हे माहिती असुन सुध्दा मला एका मुलाने माझ्यातले गुण स्वभाव, साहसीवृत्ती बघुन मला पसंत केले. परंतु माझा लग्नाला विरोध होता. कारण एकदा ठेच खाल्लेली होती. सगळे पुरुष सारखेच असतात, असा समज माझ्या मनात होता. मुलाकडील घरच्याचा विरोध होता, शेवटी एक दीड वर्षानंतर त्याचा हटट कमी न झाल्यामुळे मी विचार बदलला त्याचेशी विवाहबदध होण्याचे ठरवले. नशीबाने मला संधी दिली असावी आणि या संधीचा फायदा घेऊन मी माझ्या आयुष्याचं सोनं करण्याच ठरवल. 
    मला बचत गटामध्ये सहभागी व्हायची खुप दिवसापासुन इच्छा होती. माविम सहयोगीनी ताईच्या माध्यमातुन ही संधी मला मिळाली. मी आम्रपाली गटाची सदस्य झाली. गावामध्ये केंद्र सरकारमान्य शिवणकला डिप्लोमा व पार्लरचा डिप्लोमा कोर्स चालविते. माझ्याकडे गरीब गरजु मुली शिकायला येतात. त्यांना मानसिक, आर्थिक आधार देण्याचं काम मी करीत आहे.
    मी शिकविलेल्या काही मुलींचे व्यवसाय सुरु झालेले आहे. ते पाहून मनाला समाधान मिळते. आज माझ्याकडे असलेल्या कौशल्यामुळे माझी प्रगती झाली,आज. मी खुप समाधानी व आनंदी आहे.याचे खरे श्रेय .माविमचे आहे

    महागाईवर मात सावंगी मेघेतील कथा


    भिमाई स्वयं सहायता महिला बचत गट सावंगी मेघे,वर्धा येथील गटामध्ये १४ महिलांचा सहभाग आहे. गटातील नियमीत बचत, महिलांचा सहभाग बघुन वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वर्धा शाखने गटाला रुपये १०००० चे कर्ज दिले. त्याचा उपयोग गटातील महिलांनी कुटुंबातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी केला. दरमहा बँकेने ठरवुन दिलेल्या किस्तीने कर्जाची परतफेड नियमित केली. त्यामुळे गटाप्रती बँकेचा विश्वास वाढला. 

    गटातील महिलांनी एकत्र बसुन गटाचा व्यवसाय करण्या संदर्भात चर्चा केली. त्यातुन अनेक अडचणी पुढे आल्या. व्यवसाय सुरु केला तर मार्केटींग करावे लागले. सर्वांना सहभागी होऊन एकत्र काम करावे लागेल व त्यातुन मिळालेला नफा वाटुन घ्यावा लागेल. त्यामुळे सर्वांनी आपला दर महिन्याला लागणारा खर्च कमी करण्या संदर्भात चर्चा करुन वर्षभरात लागणारे धान्य विकत घेण्याचा निर्णय घेतला. 

    बाजारभाव कमी असतो अशा वेळेस धान्य विकत घेऊन सर्वांना कमी किमतीत वाटुन द्यावे. त्यातुन दरवेळेस होणारी भाववाढ यातुन सर्व सभासदांना सुटका मिळेल. तसेच वेळेवर धान्य खरेदी करिता सभासदांकडे पैसे नसतात, त्यांना मदत होईल. सर्वानुमते गटात ठराव पारित करुन बँकेकडे सादर केला व धान्य विक्रीचा व्यवसाय निवडला. बँकेचे गटाची व्दितीय प्रतवारी करुन गटाला व्यवसायाकरिता रुपये ६००००/- चे कर्ज मंजुर केले.

    गटाने बँकेकडून मिळालेल्या कर्जातून बाजारात जाऊन ठोकमध्ये धान्य, तेल खरेदी केले व गरजेनुसार कमी भावात सभासदांना वाटून दिले. त्यातुन सभासदांचा कुटुंबाला दरमहा होणारा खर्च वाचला, तसेच बाजार भावापेक्षा कमी किंमतीत धान्य व तेल मिळाल्यामुळे कुटुंबाला नफा झाला. सर्व सभासदांनी गटाकडून घेतलेल्या मालाची रक्कम त्यांच्या नावे कर्ज स्वरुपात दाखविण्यात आली. ठरविल्याप्रमाणे दरमहा रुपये २००/- कर्ज व व्याज परत करतात. गटाकडे जमा झालेल्या रकमेतुन बँकेची परतफेड सुरु आहे. अशाप्रकारे गटाने बँकेचा विश्वास संपादन केलेला आहे गटाने घेतलेल्या कर्जावर माविमकडून ७ टक्के व्याजाचा परतावा गटाला नियमित मिळतो. अशाप्रकारे भिमाई गटाने धान्याच्या पुरवठा करुन महागाईवर मात केलेली आहे.

    उद्योगाची भरारी


    हिंगणी हे गाव सेलु तालुक्यातील बोरधरण रोडवर बसलेले आहे. त्या गावाची लोकसंख्या २००० पर्यंत आहे. गावात एकूण ४० ते ४५ गटांची स्थापना झालेली आहे. त्यापैकी माविम अंतर्गत त्या गावामध्ये ५ गटांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यातच उन्नती स्वयंसहाय्यता गटाची स्थापना १५ मे २०१० रोजी झालेली असून, त्या गटातील सदस्या सौ.ज्योत्स्ना रमेश उरकुडे हया गटामध्ये येण्यापूर्वी फक्त चूल आणि मूल इतपतच मर्यादित होत्या. तसेच घराबाहेर निघण्याचे स्वातंत्र्य नव्हते. पण मनात उद्योग करण्याची खूप इच्छा होती, पण काय करणार. असं त्या सांगतात.

    माविम सहयोगीनी मार्फत जेव्हा उन्नती बचत गटाची स्थापना झाली. तेव्हापासून त्या गटामध्ये सक्रीय सभासद म्हणून सहभागी आहे. गटाच्या नियमित सभेला उपस्थित राहणे
    , प्रशिक्षणामध्ये सहभागी होणे. यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्यातून उद्योजकता जाणिवजागृती प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योग करण्याची इच्छा निर्माण झाली. गटातून रुपये ४०००/- कर्ज घेऊन साडी, रेडिमेड कपडयांच्या व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसायाच्या उत्पन्नातून गटाच्या कर्जाची परतफेड केली. त्यानंतर माविम सहयोगीनीच्या मार्गदर्शनाने महात्मा फुले महामंडळातील योजनेच्या माध्यमातून रुपये २००००/- कर्ज घेऊन त्यांनी व्यवसायामध्ये वाढ केली. तसेच व्यवसायाच्या माध्यमातून वर्षामध्ये कर्जाची परतफेड झाली. 

    ज्योत्स्नाताईची उद्योगातील प्रगती व कर्ज परतफेडीची प्रामाणिकता पाहून बँक ऑफ इंडिया
    ,हिंगणी शाखेने त्यांचा सत्कार केला. त्यांनी व्यवसायात वाढ करण्याकरिता बँक ऑफ इंडिया हिंगणी शाखेकडे रुपये ५००००/- कर्जाची मागणी केली. बँकेने रुपये ५००००/- चे कर्ज दिले. ज्योत्स्ना ताईच्या उद्योगाला भरभराट आलेली असून, व्यवसायातून तिला चांगल्या प्रकारे नफा मिळतो.


    तिच्या हया आदर्शामुळे गावात झालेल्या गाव विकास समितीमध्ये अध्यक्ष म्हणून 
    निवड झाली. गाव विकास समितीच्या माध्यमातून सर्व गटातील महिलांच्या 
    सहभागाने गावामध्ये वृक्षारोपण, एच.आय.व्ही.एडस जाणिवजागृती मार्गदर्शन कार्यक्रम, रॅली, महिलांची आरोग्य व हिमोग्लोबीन तपासणी, सावित्रीबाई फुले जयंती इत्यादी महत्वपूर्ण कार्यक्रम गावात घेतले.

    गटात येण्यापूर्वीची परिस्थिती व व्यवसायाच्या माध्यमातून घेतलेली भरारी हे यशस्वी 


    उद्योजक म्हणून आदर्श घडविणारे आहे
    .