शुक्रवार, 17 फ़रवरी 2012

धैर्यशील

वर्धा जिल्‍ह्यातील कांढळी ते सेवाग्राम रोडवर एक छोटसं गाव आहे वायगाव (बै.). जवळपास ८०० लोकसंख्येच्या ह्या छोट्याशा गावात असणारं एक कुटुंब म्‍हणजे शालुचं! याच गावात शालू लहानाची मोठी झाली. तिच्‍या आई-वडिलांची परिस्थिती गरिबीची होती. ती घरात सर्वात मोठी. तिचे आईवडील शेतमजुरी करुन आपल्‍या कुटुंबाचा सांभाळ करीत असत. तर, शालू व तिचे भाऊ शाळा शिकत होते. आज आपल्या पायावर उभी राहिलेली शालू आपल्या कुटुंबाला हातभार लावीत आहे.

शालूचे शिक्षण कसेबसे दहावी पर्यंत झाले. तिला पुढे शिकायचे होते. पण परिस्थिती पुढे तिला नमते घ्यावे लागले. लवकरच तिच्‍या आईवडिलांनी तिचे लग्‍न करण्याचाही निर्णय घेतला. त्‍यामुळे तिच्यापुढे शिक्षणाचा पर्याय शिल्लक राहिला नाही. लग्नानंतर शालूच्या मुली अगदी लहान असतानाच तिच्यावर फार मोठे संकट कोसळले, तिच्‍या पतीने आत्‍महत्‍या केली. या परिस्थितीतून बाहेर पडताना शालूचा स्वाभिमान आणि जिद्द तिला उपयोगी पडली. तिच्यापुढे मोठा प्रश्न होता तो तिच्या मुलींच्या भवितव्याचा.. त्यासाठी तिने शेवटी निर्णय घेतला माहेरी जाण्‍याचा. 
 
ती माहेरी गेल्‍यावर माहेरच्‍या व्‍यक्तींकडून तिच्‍या परिवाराच्‍या गरजा पूर्ण होणे अपेक्षित नव्हते, तिच्‍या समस्‍या तिलाच सोडवायच्‍या होत्‍या. त्यामुळे इतरांवर अवलंबून न राहता स्‍वतःच्‍या पायावर उभे राहून आपल्‍या मुलींना चांगले शिक्षण द्यायचे हे तिचे ध्‍येय होते. 

दरम्यान माविम सहयोगीनीच्‍या मार्गदर्शनाने वायगाव (बै.) येथे बचत गटाची स्‍थापना झाली. शालूला बचत गटाची संघटिका बनण्‍याची संधी मिळाली. शालू संघटिका म्‍हणून गटाचे काम पाहू लागली. गटाचे आर्थिक व्‍यवहार सुरळीत सुरु होते. शालूने गटातून कर्ज घेऊन शिलाई मशीन खरेदी केली आणि तिने कपडे शिवून देण्यास सुरुवात केली. त्यातून तिने स्‍वतःचे अस्तित्‍व निर्माण केले. व्‍यवसायातून मिळालेल्‍या मिळकतीतून ती आपल्‍या मुलींच्‍या गरजा पूर्ण करण्‍यास समर्थ ठरली. एवढेच नव्‍हे तर स्वत:वर बेतलेल्या परिस्थितीमुळे ती आता गावात प्रत्‍येक कार्यक्रमास उपस्थित राहून, सर्वांशी सहकार्याच्‍या भावनेने शक्य होईल ती मदत करते. तिच्‍या ह्या भरारीतून इतरांनाही निश्चितच प्रेरणा मिळते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें