बुधवार, 28 सितंबर 2011

गृहोद्योगातून भरभराट


बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

इच्छा तेथे मार्ग असं म्हणतात ही उक्ती अतिशय सार्थ आहे. याचा प्रत्यय वर्धा जिल्ह्यातील केळझर इथल्या सावली स्वयंसहायता महिला बचत गटाच्या कामात येते. सेलू तालुक्यातील केळझर हे गाव इथल्या पांडवकालीन मंदिरांसाठी प्रसिध्द आहे. या गावात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातल्या १२ जणींनी एकत्र येवून ऑगस्ट २००७ मध्ये आपल्या एकीने यशाचा नवा अध्याय लिहिला.

घरात लागणा-या शेवया-पापड्या, सरगुंडे आदींचे उत्पादन करणारा हा गट जिल्ह्यात प्रसिध्द आहे. तो त्यांच्या नाविन्यपूर्ण मार्केटींगसाठी जिल्ह्यात इतर बचतगट अशी उत्पादने विकत आहेत. मात्र सावली स्वयंसहायता गटाच्या महिला वैशिष्टपूर्ण पध्दतीने, आकर्षकपणाने स्टॉल सजवणे, गाडी लावली तर ती गाडी लक्षवेधी ठरेल अशी मांडणे अशा पध्दतीने विक्री करतात.



बँकेचे ३५ हजारांचे कर्ज घेऊन त्याची पूर्ण फेड केलेल्या या गटाकडे ३५ हजारांचे खेळते भांडवल आज आहे. आपल्याला स्थैर्य आलं म्हणजे संपले असे न करता या गटातील महिलांनी गावात इतर महिलांना प्रेरित करुन इतर गटांच्या स्थापनेत मोलाचा वाटा उचलला आहे.

सेलू पंचायत समितीचे विस्तार अधिकारी निमजे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मदतीने त्यांनी आपल्या आयुष्यातून गरिबीचा अंधार कायमचा दूर केला आहे. त्यांचे हे कार्य इतरांनाही प्रेरक ठरले आहे.



  •                                                                                                                                                             प्रशांत दैठणकर





  • मंगलवार, 27 सितंबर 2011

    वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे




    वर्धा जिल्ह्यात आष्टीला लागून पेठ अहमदपूर हे एक छोटेसे गाव आहे. त्या गावाची लोकसंख्या २९८२ आहे. गावामध्ये एकूण ५ गटाची स्थापना माविमच्या माध्यमातून झालेली आहे. त्यापैकी तेजस्विनी योजनेतंर्गत निर्मल गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. गटामध्ये एकूण १८ सभासद आहे. गटातील व्यवहार पाहून बँकेने गटाला रुपये १५००० चे कर्ज दिले. 

    कर्जाचा उपयोग महिलांनी घरगुती, शेतीच्या अडचणीकरिता केला. बँकेची ठरलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड केली. त्यामुळे गटाला बँकेनी दुसरे कर्ज ५०००० मंजूर केले. या रक्कमेतून गटाला कोणता उद्योग करायचा सुचत नव्हते. तेव्हा सहयोगिनीच्या मार्गदर्शनाने गटाने नर्सरी उद्योग करण्याचे ठरविले. त्याकरिता जागेची आवश्यकता होती. गटातील एका सभासदाकडे मोठा प्लॉट रिकामा होता. त्या ठिकाणी नर्सरी व्यवसाय होऊ शकतो असे लक्षात आल्यानंतर गटातील सभासद शांता धांदे या महिलेकडून नर्सरी उद्योग करण्याकरिता जागा वापरण्यास मंजूरी घेऊन गटाने नर्सरी उद्योग सुरु केला. 

    गटातील सर्व महिला मिळून स्वत:च्या प्रयत्नाने वनविभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले. त्यामुळे त्यांच्या नर्सरीमधील रोपांची चांगल्या प्रकारे वाढ झाली. नर्सरीमधील रोपांची रुपये २५००० ला विक्री करुन त्यांना रुपये १०००० चा नफा मिळाला. पुढे हाच उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु करण्याचा मानस बचतगटाचा आहे. त्याकरिता गटाने बँकेकडे प्रस्ताव सादर करुन कर्ज मंजूर करुन घेतलेले आहे.

    गटाने नर्सरी उद्योग निवडून पर्यावरणाच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. संत तुकारामांच्या ओवीनुसार वृक्षांना सुध्दा आप्तस्वकीयांप्रमाणे जीवनात स्थान दिलेले आहे.