शुक्रवार, 6 जनवरी 2012

''अन्नपूर्णा'' महिला स्वयंम सहाय्यता बचत गट

ग्रामीण क्षेत्रातील महिलानी स्वत:ला मर्यादित क्षेत्रापुरते न ठेवता, महिला बचत गटासारख्या चळवळीच्या माध्यमातून, कुटुंबाचीही जबाबदारी स्वीकारलेली पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील आष्टी पंचायत समिती अंतर्गत येणा-या माणिकवाडा ता. आष्टी जि. वर्धा येथील अन्नपूर्णा महिला स्वयंम सहाय्यता बचत गटाची कामगिरी अशाच प्रकारचे महिलाचे यश अधोरेखीत करणारी आहे.
 
अन्‍नपूर्णा बचत गटाची स्थापना दिनांक 3 ऑगस्‍ट 2005 ला करण्यात आली. ग्रामीण महिलांनी एकत्र येवून 12 सदस्यांचा गट करण्याचे ठरविले. सर्वानुमते सौ. पुष्पा दशरथ घागरे यांची अध्यक्ष म्हणून तर सचिव म्‍हणून सौ.बेबी रामराव गंधळे यांची निवड केली. बँक ऑफ इंडिया साहुर शाखे कडून गटाची प्रथम प्रतवारी दिनांक 8 नोव्‍हेंबर 2007 रोजी झाली आणि रु 25000/- फिरतानिधी गटाअंतर्गत कर्ज वाटपा करिता उपलब्ध करुन दिला. कालांतराने महिलांना गटाच्या कर्जातुन प्रगती साधण्याचे महत्‍त्व कळु लागल्यावर त्यांनी दुग्धव्यवसाय करण्याचे ठरविले.दुग्ध व्यवसायाकरिता तीस दुधाळू संकरित गायी खरेदी करण्या साठी बँक ऑफ इंडिया साहूर शाखेने दिनांक 9 सप्‍टेंबर 2010 ला व्दितीय प्रतवारी करुन गटाला दुग्ध व्यवसायाकरिता एकूण दोन लाख रुपये कर्ज मंजूर केले

बचतगटाला कर्जाचा पहिला टप्पा दिनांक 4 फेब्रुवारी 2011 ला 10 संकरित गायी खरेदी करण्याकरिता देण्यात आला. संकरित गायीचे संगोपन महिला उत्तम रित्या करु लागल्‍या. दररोज दुध विक्रीच्या माध्यमातून पैशाची आवक सुरु झाली. जास्त शिक्षण नसले तरी स्व:ताच्या पायावर उभे राहून, आपल्या संसारासाठी हातभार लावण्याची धावपळ या गटाच्या सदस्यामध्ये दिसुन येवू लागली

दरमहा 5 तारखेला गटाची मसिक बैठक होते. व्यवसायात मिळणारा नफा तोटा याचा हिशोब ठेवणे, खरेदी विक्री उत्पादन ही सर्व कामे महिला चोखपणे पार पाडतात. बैठकीत गटाच्या कामाविषयीच्या समस्या जमाखर्चाचे सर्व हिशोब या विषयी चर्चा केली जाते. गटातील सर्व महिला एकत्र येवून सण समारंभ साजरा करीत असल्याने त्यांच्यातील एकोपा टिकून आहे.

गावात ग्रामसफाई, वृक्षारोपण तसेच व्यसनमुक्ती ,रांगोळी स्पर्धा, इत्यादी कार्यक्रम अन्नपुर्णा गटात राबविले जातात. बचत गटाची ही यशस्वी वाटचाल पुढे सुरु ठेवण्याचा महिलांचा निर्धार आहे. त्या ख-या अर्थाने सक्षम झाल्या आहेत. गटाच्या माध्यमातून बचत गटाच्या मदतीने स्त्रियांचा व त्यांच्या कुटुंबाचा संसार फुलू लागल्‍याचे निदर्शनास आले आहे. बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना बँकेचे व्यवहार सुध्दा कळू लागले तसेच स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. ते त्यांनी मेहनतीच्या आधारावर प्राप्त केले आहे. या आदर्श गटाची कार्यप्रणाली व भरभराट पाहुन इतर गावातील ग्रामीण भागातील स्त्रियासुध्दा आशेचे किरण म्हणुन हया आदर्शाने प्रेरीत झाल्या आहेत.


महान्‍यूजवरुन साभार

बुधवार, 4 जनवरी 2012

बहु सामाजिक उपक्रम गट !


देवळी पासून २५ किलोमीटर असलेले गुंजखेड हे गाव, या गावामध्ये बचत गटाचा लवलेश नसतानासुध्दा ग्रामपंचायतच्या मदतीने १५ महिला एकत्र येवून बचत गट स्थापन केला. बचत गटाचे नाव रमाबाई महिला बचत गट ठेवण्यात आले. बचत गट सुरु करण्यामागचा उद्देश विचारला असता सावकाराच्या जाचातून सुटका व्हावी व महिलांच्या गरजा महिलांनीच भागवाव्यात व बचत गटातून जमा झालेला पैसा महिलांच्याच कामात यावा असे त्यांनी सांगितले.

सुरूवातीला त्यांनी पैसे जमा करुन अंतर्गत व्यवहार सुरु केला. त्यानंतर त्यांना खेळते भांडवल मिळाले. खेळत्या भांडवल मधून त्यांनी अंतर्गत कर्ज वाटप केले व त्या माध्यमातून महिलांच्या गरजा भागत होत्या. त्यानंतर त्यांना कपडा व्यवसायासाठी २ लाख २० हजार रुपये मंजूर झाले. त्यामधून त्यांनी कपडा व्यवसाय सुरु केला. कपडा व्यवसायामधून त्या महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारत नव्हती. 

मग सर्व महिलांनी मिळून चर्चा केली की कपडा व्यवसाय हा आपण सर्वजणी मिळून करतो त्यापैकी काही महिला बचतगटामधे काम करतात तर काही महिला शेतीच्या कामावर जातात.त्यामुळे जर असे केले तर आपण सर्व महिलांनी वैयक्तिक व्यवसाय करायचा व कर्ज गटामधून घ्यायचे हा विचार सुरूवातीला नवीन होता ‍की गट हा सुध्दा बहुव्यवसायी होऊ शकतो.सर्व महिलांनी ठरवून शेती, किराणा, हॉटेल, स्टेशनरी, शिलाई मशीन, पापड उद्योग इत्यादी व्यवसायासाठी कर्ज घेतले. हा गट बहुव्यवसायी म्हणून नावारुपास आला. वैयक्तिक व्यवसाय असल्यामुळे महिला जीव ओतून काम करु लागल्या व त्यांना चांगला नफा मिळू लागला. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारुन त्या सक्षम बनल्या. व कर्ज व्याजासहित गटामध्ये परत करु लागल्या.

एका गटामधील हॉटेल चालविण्यार्‍या महिलेचे घर सर्वसाधारण होते. परंतु या व्यवसायामुळे त्या महिलेचे आज दुमजली घर आहे व हे सर्व गटामधील कर्ज मिळाल्यामुळे झाले हे ती महिला अभिमानाने सांगते. त्याचप्रमाणे एका महिलेची शेती खूप दिवसांपासून पडिक होती. त्या महिलेने गटामधून कर्ज घेऊन शेती केली व आज त्या महिलेला चांगले उत्पन्न मिळत आहे.

महिलांना कर्ज देणे व परत करणे हे आपले कर्तव्य वाटू लागले. त्यामुळे पैसा खेळता राहिला. त्याचप्रमाणे त्यांच्या यशस्वी गटाचे रहस्य म्हणजे त्यांच्या मासिक बैठका वेळेवर होत आहेत तसेच मासिक बचतीसोबतच महिला आपल्या गटातील अडीअडचणी भागविण्यास नेहमी तत्पर असतात. बचत आपल्या गरजा भागविण्यात कामात येत आहे. त्याचप्रमाणे गटामध्ये महिलांच्या गरजा भागणे महत्वाचे असल्यामुळे महिलांनी वेगवेगळया व्यवसायासाठी पैसे घेतले तरी गटप्रमुखांनी किंवा कोणत्याही सदस्यांनी आडकाठी आणली नाही.

गटामध्ये फक्त आर्थिक देवाणघेवाण होत नाही तर महिलांच्या सु:ख दु:खावरही चर्चा करण्यात येते. त्यासोबत आरोग्यविषयक शिबीर घेण्यात येते त्याचप्रमाणे अंगणवाडीला देण्यात येणारा पूरक पोषक आहार रमाबाई महिला बचत गटाकडे आहे.स्वच्छता अभियान, तंटामुक्त ग्राम अभियानामध्ये सुध्दा गटामधील सदस्यांचा सहभाग आहे.

रमाबाई महिला बचत गट हा फक्त बहुव्यवसायी गट नसून बहु सामाजिक उपक्रम गट आहे. त्यामुळे त्यावरुन असे लक्षात येते की, रमाबाई महिला बचत गट हा महिला धनव्यवहारासोबतच मनव्यवहार सुध्दा करतात म्हणून हा गट यशस्वी दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

महान्‍यूजवरुन साभार