शनिवार, 17 सितंबर 2011

बचतगटातील पाच महिलांचे सक्षमीकरण




वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील गुंजरखेडा येथील रमाबाई महिला बचत गटांनी आपला आत्मविश्वास दृढ करुन श्रम शक्तीला सर्वोत्तम प्राधान्य दिले. त्यामुळे या बचत गटातील पाच महिलांनी अंतर्गत कर्ज घेवून जीवनमान उंचाविण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून सक्षमिकरणाकडे वाटचाल करीत आहे.

गुंजरखेडा हे गाव पुलगाव ते आर्वी या रस्त्यावर असून, या गावाची लोकसंख्या दोन हजाराचया वर आहे. येथील दारिद्र्य रेषेखालील १५ महिला एकत येऊन त्यांनी २२ जानेवारी २००३ रोजी रमाबाई महिला बचत गटाची स्थापना केली. तत्पूर्वी या गटाची पहिली बैठक २५ डिसेंबर २००२ रोजी संपन्न झाली होती त्या बैठकीत बचत गटाच्या नावा सोबतच अनेक ठराव घेण्यात आले होते. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून प्रतिभा अनिल इंगळे व सचिव म्हणून वनिता गौतम सिंगनापूरे यांच्या नावाची निवड करण्यात आली.

बचत गटाची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर अध्यक्ष श्रीमती इंगळे म्हणाल्या की रमाबाई बचत गटातील सर्वाधिक महिला ह्या दारिद्र रेषेखालील आहेत. पुरेसे शिक्षण नसलेल्या बचत गटाच्या महिलांमध्ये जबरदस्त असा आत्मविश्वास आहे. बैठकीत ठरल्याप्रमाणे रु. ३० मासीक वर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली. रमाबाई महिला बचत गटाच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र पुलगाव येथे बचतीचे खाते उघडण्यात आले. दोन वर्षात १० हजार ८०० रुपये जमा झाली. या रकमेतून सदस्यांना अंतर्गत कर्ज २ टक्के व्याजावर देण्यात आले. तसेच कर्जाऊ रकमेचे नियमित परतफेड बचत खात्यात जमा होत असल्याने बचत गटाची प्रामाणिकता पाहून १२ जानेवारी २००५ मध्ये महाराष्ट्र बँकेने १५ हजाराचे कर्ज गटाच्या अंतर्गत उलाढाली साठी मंजूर केले.

या बचत गटातील पाच महिलांनी स्वत:चा व्यवसाय उभारला त्यामध्ये नंदा ठाकरे या महिलेनी दोन हजार रुपये कर्ज घेवून बांगड्या व स्टेशनरीचा फिरते व्यवसाय प्रारंभ केला. या व्यवसायातून त्यांना महिन्याला किमान ३ हजार रुपये नफा होत आहे. 

मंजू शेंडे या महिलेनी ५ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांनी टेलरींगचा व्यवसाय स्व:ताच्या घरी सुरु केले. या व्यवसायाला परिसरात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने त्यांना सुध्दा महिण्याला ४ हजार रुपये शुध्द लाभ मिळत आहे. 

शालू वडकर या महिलेचा गावातच हॉटेलच्या व्यवसायासाठी ५ हजार रुपये कर्ज दिले. गावातील मुख्य रस्त्यालगत एकच हॉटेल असल्यामुळे व्यवसायात प्रगती सुरुच असून सर्व खर्च वजा जाता किमान ६ हजार रुपये निव्वळ नफा कमवित आहे. 

मेंढे या महिलेनी लेडीज गारमेंटचा व्यवसाय स्विकारुन प्रगती साधली आहे. त्यांना सुध्दा महिन्याला ३ हजार ५०० रुपये खर्च वजा जाता शुध्द लाभ मिळत आहे. 

या बचत गटाला आंगणवाडीचा आहार पुरविण्याची निविदा मंजूर झाली. त्यांचे संचलन वर्षा खडसे यांना बचत गटाच्या सदस्याला देण्यात आल्यामुळे त्यांना सुध्दा महिन्याकाठी ९०० रुपये मिळत आहे.

छाया खोब्रागडे या महिलेने एक हजार रुपये कर्ज घेतले त्या रकमेतून एक म्हैस घेवून दुग्ध व्यवसाय करीत आहेत.त्यांचा व्यवसाय प्रगती पथावर असल्यामुळे आता त्यांच्याकडे ४ म्हशी झाल्या आहेत. त्यांना सुध्दा सर्व खर्च वजा जाता किमान ७ हजार रुपये नफा मिळत आहे.

बचत गटाचा मूळ व्यवसाय साड्या विक्रीचा होता. प्रत्येक महिलेला कर्जाउ रक्कम दिल्यामुळे त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. कर्जाऊ घेतलेली रक्कम टप्प्याटप्प्याने व्याजासह बचत गटाला परतफेड केली आहे..

साडयाच्या व्यवसायात वंदना बोरकर, मंगला इंगळे, अंजिता कळमकर, वनिता सिंगणापुर, प्रतिमा इंगळे व मंजू शेंडे कार्य करत आहेत. गटातील महिला त्यांच्या परिसरातील गावोगावी जाऊन घर भेटीतून साड्यांची विक्री करीत असतात. त्यांचे परिश्रम वाया जात नाही. उलट त्यांच्या साड्याच्या विक्रीतवाढ सुध्दा होत असते. महिन्याला साड्याच्या विक्रीपासून ६० हजार मिळतात. विक्रीवर २० टक्के कमीशन मिळत असल्याने बचतगटातील ६ महिलांना किमान २ हजार रुपये मिळत आहे असे अध्यक्ष श्रीमती इंगळे यांनी सांगितले.

बचत गटातील महिला त्यांच्या व्यवसाला पारंगत होत असून, त्यांनी त्यांच्या कुटूंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या व्यवसायाला त्यांनी वाहून घेतले आहे.

अंतर्गत कर्जासाठी बचत गटाने घेतलेली १५ हजार रकमेचा बँकेला परतफेड केल्यानंतर ८ जानेवारी २००७ रोजी पहिला हप्ता ८३,६६२ रुपयाचा, दुसरा हप्ता १६ एप्रिल २००७ रोजी ८४८५ रुपयाचा व तिसरा हप्ता २६ डिसेंबर २०१० रोजी ४८ हजार रुपये असे एकूण २ लाख २० हजार रुपये बँकेने व्यवसायासाठी दिले असून, ४ हजार रुपयाचा विमा सुध्दा बँकेने काढला आहे.

कापड व्यवसायासाठी मिळालेल्या रकमेतून महिलांसाठी साड्या, लुगडी, ड्रेस मटेरीयल, धोतर, लुंग्या इत्यादी बाजारातून घेण्यात आल्या असून ह्या वस्तू घरोघरी जाऊन बचत गटाच्या महिला विक्री करीत आहेत. विक्री झालेल्या माला नंतर नविन माल खरेदी केल्या जात असून, व्यवसाय उत्तम सुरु असल्याची ग्वाही श्रीमती इंगळे यांनी दिली.

सोमवार, 12 सितंबर 2011

स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर जनजागृती होणे गरजेचे - राज्यमंत्री राजेंद्र मुळक



राज्यात स्त्रीभ्रूण हत्या हा विषय शासनस्तरावर अतिशय गांभीर्याने हाताळला जात आहे. या विषयासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासोबतच सोनोग्राफी केंद्रावर धाडी घालून याला अटकाव करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्याचे वित्त व नियोजन, उर्जा,जलसंपदा, संसदीय कार्य आणि उत्पादन शुल्क राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी या विषयात संवेदनशील पध्दतीने काम सुरु ठेवले आहे. याबाबत त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

प्रश्न :- स्त्रीभ्रूण हत्या हा विषय आपण कसा हाताळता आणि त्यात आजवर आपण काय काम केले आहे?
उत्तर :- मुळात स्त्रीभ्रूण हत्या हा विषय संवेदनक्षम आहे. आपण राजस्थानात किंवा उत्तरेत असा प्रकार घडतो असं मानत होतो. परंतु आपल्या राज्यातही थोड्याफार फरकाने ही स्थिती आहे हे नुकत्याच झालेल्या काही प्रकरणांवरुन दिसतय. नियोजन खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम करताना आकडेवारी सातत्याने समोर येते. यामध्ये मुलींचं दर हजारी प्रमाण खूपच कमी आहे. हा केवळ एक आकडा नसून गंभीर, सामाजिक प्रश्न आहे हे माझ्या लक्षात आलं.

मुलींचे दरहजारी प्रमाण वाढवावयचे असेल तर समाजात जागृतीसोबत या संबंधाने असणा-या कायद्यांचे पालन हे दोन पैलू आहेत. या दोन्ही कडे तितक्याच प्रमाणात मेहनत घ्यावी लागणार आहे. असं मला वाटतं.

प्रश्न :- यामुळे समाजात काही प्रश्न निर्माण झाले आहेत असं तुम्हाला वाटतं का?
उत्तर :- निश्चितपणे. नुसते प्रश्न निर्माण झाले आहेत असं नव्हे तर गांभीर्याने या क्षेत्रात काम झाले नाही तर येणा-या काळात समाजाची संरचना बदलेल इतके दूरगामी परिणाम होतील. दर हजारी १०० मुलींची तफावत म्हणजे काही वर्षांनी दहा टक्के मुलांना अविवाहित राहण्याचा प्रसंग निर्माण होवू शकतो.

प्रश्न :- मुलगाच पाहिजे असा हट्ट का धरला जातो?.
उत्तर :- ही सामाजिक धारणा बनलीय आणि ती पूर्णपणे चुकीची आहे असं माझं मत आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असं समाजात मानलं जातं. आज मुली देखील सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नेत्रदीपक कामगिरी करताना दिसतात. कार्पोरेट जगत असो की क्रिडाक्षेत्र सर्वच क्षेत्रात मुलींचे स्वत:चे असे स्थान निर्माण केल्याचे आपणास दिसते अशा स्थितीत मुलालाच वंशाचा दिवा मानणे चुकीचे आहे असं मला वाटतं.

प्रश्न :- मुलींचे प्रमाण कमी होत आहे या मागची कारणं काय वाटतात?
उत्तर :- आपल्या सामाजिक रुढी परंपरा याला निश्चितपणानं जबाबदार आहे. कायदा करण्यात आला असला तरी त्यातून पळवाट शोधून हुंडा मागितला आणि दिला जातो. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे सांगता येत नाही असं कुठेतरी मी वाचलं होतं. मुलगा कसाही निघाला तरी घसघशीत हुंडा मात्र मिळवता येतो अशी धारणा समाजात आहे. हुंडा आवाक्याच्या बाहेर जात आहे आणि मुलगी झाली तर हुंडा कुठून आणायचा या भितीने अनेकजण स्त्री भ्रुण हत्‍त्‍या आणि गर्भजल चिकित्सा या मार्गांकडे वळत आहेत.


प्रश्न :- ही परिस्थिती बदलण्यासाठी काय उपाय करता येतील ?
उत्तर :- या परिस्थितीला बदलण्यासाठी जनप्रबोधन आणि कायद्याची कडक अंमलबजावणी हे दोन मार्ग आहेत. जनप्रबोधन आणि प्रोत्साहन यातून समाजाला स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यापासून परावृत्त करता येईल आणि समाजाला चांगली सकारात्मक संदेश देखील पोहोचेल. मी वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. स्वातंत्र्य दिनी वर्धा येथे एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेणा-या महिलांचा शासनातर्फे आम्ही सत्कार केला. समाजात असे चांगले वागणारे लोक आहेत हे दाखवून दिले तर या मार्गावर इतरही लोक निश्चितपणाने येतील. अशा प्रकारचा उपक्रम राज्यात सर्वत्र करण्यात येत आहे.

प्रश्न :- कायद्याच्या अंमलबजावणी बाबत काय करीत आहात?.
उत्तर :- गर्भजल लिंग निदान चाचण्यांना रोखण्यासाठी शासनाने कायदा केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात याची अंमलबजावणी व्हावी यासाठी समित्यांचे गठण करण्यात आलेले आहे. या माध्यमातून सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी तसेच अचानक तपासणी करण्यात येत आहे. राज्यात ज्या केंद्रांचा व्यवहार संशयास्पद वाटला अशी केंद्र सिल करण्यता आली आहेत.
गर्भलिंग तपासणी करताना सापडलेल्या डॉक्टरांवर कठोर शिक्षा होईल अशी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामुळे स्त्रीभ्रूण हत्या प्रमाण निश्चितपणाने घटत जाईल असं असलं तरी समाजानं या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष दिल्या खेरीज हा प्रकार पूर्णपणे बंद होईल असं चित्र नाही.

प्रश्न :- याखेरीज आणखी कोणते मार्ग आपण हाताळत आहोत ?
उत्तर :- यात प्रबोधन मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे हे स्पष्टच आहे. गणेशोत्सव आणि नवरात्री महोत्सव काळात सार्वजनिक मंडळांनी याविषयाला अनुसरुन देखावे सादर करावेत असा प्रयत्न आम्ही करीत आहोत. या काळात मोठ्या प्रमाणावर देखाव्यांसोबतच पथनाट्य आणि गाण्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश पोहचविण्याचेही नियोजन आहे. यात टिव्ही चॅनेल्स, आकाशवाणी तसेच खाजगी एफएम वाहिन्यांचीही मदत घेतली जाणार आहे.

स्त्रीभ्रूण हत्या हा समाजाला लागलेला कलंक आहे. हा मोठा सामाजिक भ्रष्टाचार देखील आहे. याविरुध्द जनशक्ती एकत्र व्हावी आणि हे प्रकार संपून पुन्हा मुलींचे दरहजारी प्रमाण हजारापर्यंत यावे यासाठीच हे प्रयत्न सुरु ठेवणार आहोत.

  •                                                                                                                                                                          प्रशांत दैठणकर